Tuesday, February 26, 2013
मानवजातीच्या प्रकृतीचेच दिव्य रूपांतरण व्हायला हवे
भौतिकवादी असोत वा अध्यात्मवादी, आत्म्या-परमात्म्याचे अस्तित्व नाकारणारे असोत वा तशा अस्तित्वावर श्रद्धा असणारे असोत, ज्या ज्या व्यक्तींना जीवनाविषयी आस्था आहे आणि संकुचित स्वार्थापलीकडे समाजाच्या भल्याचा जे विचार करतात, अशा सर्वाना मानवाची सर्वागीण उन्नती कशी साधता येईल, याबाबत समान चिंता असते. प्रत्येक मानवात सुप्त क्षमता दडलेल्या असतात; त्या क्षमता व्यक्तिगणिक वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येक व्यक्तीला स्वत:मधील क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळावी, त्यासाठी आवश्यक ते स्वातंर्त्य आणि पोषक वातावरण मिळावे, परंतु एकाच्या क्षमतांचा विकास हा दुसर्यांच्या विकासाला बाधक ठरू नये, तर पूरकच ठरावा. मानवी व्यक्तित्वातील ज्या क्षमतांचा विकास हा इतर मानवांना अथवा जीवसृष्टीला दडपणारा व घातक ठरत असेल, त्या क्षमतांना आपण पाशवी अथवा आसुरी मानू व अशा पाशवी, आसुरी इच्छा-आकांक्षांना समाजात व मानवाच्या मनात थारा न मिळावा यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, याबाबत सर्व प्रकारचे समाजचिंतक विचार करीत असतात.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजातील अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था इ. सामाजिक रचना या व्यक्तींच्या वागणुकीवर, विचार करण्याच्या पद्धतीवर व भावभावनांवरदेखील सतत परिणामकारक नियंत्रण करत असतात; त्यामुळे या व्यवस्था बदलणे अधिक महत्त्वाचे आहे व सामाजिक रचना बदलल्या, तर व्यक्ती आपोआप बदलतील किंवा व्यक्तींमधील बदल अधिक सुलभ होतील अशा प्रकारे चिंतन करणार्यांना आपण ढोबळमानाने 'समाजवादी' विचारक म्हणू. या विचारसरणीमध्ये निश्चितच तथ्य आहे, परंतु समाजव्यवस्था काही आपोआप बदलत नाही. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उत्पादन साधनामध्ये वेळोवेळी बदल होतात. या बदलांना पचविण्याची क्षमता प्रचलित अर्थ, राज्य, कुटुंबव्यवस्थेत नसल्यास त्या सर्व व्यवस्थादेखील बदलण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. मात्र या व्यवस्था बदलविण्यासाठी काही व्यक्तींनाच पुढाकार घ्यावा लागतो व संघटित प्रयत्न करावे लागतात. ही जी समाजपरिवर्तनासाठी संघटित होणारी व पुढाकार घेणारी माणसं आहेत, त्यांना तरी स्वत:मधील पाशवी, आसुरी वृत्तींचा त्याग करावा लागेलच, अन्यथा त्यांनी बदलविलेल्या सामाजिक, आर्थिक, राज्यव्यवस्थेतही वेगळ्या प्रकारे, जुन्याच पाशवी, आसुरी वृत्तींचे प्राबल्य वाढत जाऊन अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही.
आम्ही जेव्हा सर्व दोषांचे खापर समाजव्यवस्थेवर फोडतो, तेव्हा आमचे स्वत:कडे लक्षच नसते. मानवी स्वभावच असा आहे की, स्वत:मधील उणिवांकडे, दोषांकडे आपले कमी लक्ष असते व इतरांमधील उणिवा, दोष आपल्याला लवकर जाणवतात. अगदी लहानपणीदेखील मी व माझ्या भावाने जर सारख्याच निष्काळजीपणे एखादी वस्तू हाताळली असेल तर 'माझ्या हातून कप पडला' आणि 'त्याने कप फोडला' असे उत्स्फूर्त स्पष्टीकरण आपण आईबापांना देत असतो. म्हणजे माझा दोष काहीच नसून माझ्या हातातून एक चूक घडली आहे; पण भाऊ मात्र दोषी आहे! आज सर्व टीव्ही चॅनल्सवर चालणार्या चर्चा, वृत्तपत्रीय लेख, ठिकठिकाणी होत असलेल्या लोकांच्या गप्पा सर्वत्र दुसर्यांना अथवा व्यवस्थेला दोष देण्याची स्पर्धा कोलाहल निर्माण करीत आहे. स्वत:खेरीज इतर सर्वाच्या हेतूबद्दल शंका घेत राहण्याची वृत्तीदेखील झपाटय़ाने पसरत आहे.
प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगत राहण्याची व स्वत:ची प्रजाती वाढविण्याची मूलभूत प्रेरणा नैसर्गिक व बलवान असल्याचे आपण या आधीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. माझ्या जगण्यासोबत मला माझे कुटुंब, जाती, धर्म, प्रांत व देशाच्याही जगण्याचे उतरत्या क्रमाने मोल वाटते. माझे कुटुंब मला जगू देत नसेल, तर स्वत:च्या कुटुंबासोबत संघर्ष करून मी जगत राहील. तसेच इतर जाती, धर्म, प्रांत व देशांच्या बाबतीतही म्हणता येईल, हे सर्व स्वाभाविक आहे.
परंतु माझ्या जीवनासाठी मला इतरांना फसविणे, लुबाडणे, दडपणे वा नष्ट करणे आवश्यक व योग्य वाटत असेल, तर ती माझ्यातली 'आसुरी' वृत्ती आहे आणि अशी आसुरी वृत्ती माझ्या स्वत:च्याच सर्वागीण उन्नतीला बाधक ठरते. शिवाय या वृत्तीमुळे समाजव्यवस्थादेखील सतत अशांत, अस्थिर व स्फोटक राहते. याउलट सर्वाचे भले व्हावे, सर्वाची उन्नती व्हावी अशी जी इच्छा आपल्या मनात कधीकधी डोकावते, तिला आपल्यातला उन्नत, विकसित व दिव्य अंश म्हणता येईल. या दिव्यत्वाचा विकास सर्व मानवांमध्ये होण्यासाठी आर्थिक, राजकीय, सामाजिक रचनांमध्येही सुयोग्य मूलभूत परिवर्तन घडवून आणता येईल. परंतु हे परिवर्तन करू इच्छिणार्या व्यक्तींना स्वत:मधील दिव्यत्वाचा विकास करण्याकडेदेखील प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे लागेल.
पृथ्वीवरील प्राणिसृष्टीच्या व मानवजातीच्या जीवनाच्या विकासासाठी भय, क्रोध, मोह, मत्सर यांसारख्या विकारांची आणि हिंसक व आक्रमक मनोवृत्तीची याआधीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर गरजही असावी. म्हणूनच ते विकार वारशाने आपल्याला मिळाले आहेत. परंतु उत्क्रांतीच्या यापुढील टप्प्यांना गाठण्यासाठी हे विकार पोषक ठरणार नसून अडथळे ठरू शकतील. अशा विकारांना मानवी मनातून कसे नष्ट करता येईल व मनाची उन्नत अवस्था सहज व नित्याची कशी साधता येईल, हा मोठा प्रश्न आहे. शिक्षण, संस्कार व योग्य आर्थिक, राजकीय व्यवस्थेचे पर्यावरण लाभल्यास असे विकास दूर होऊ शकतील, अशी समाजवादी विचारवंतांना आशा वाटते. उलटपक्षी विकार हे नैसर्गिकच असल्यामुळे ते नष्ट होणे शक्य नाही. कायद्याचे व समाजाचे दडपण व्यक्तीवर असले, तरच ते विकार काबूत राहतील; दाबून ठेवता येतील अशीही एक विचारधारा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभवी साधकांच्या मते विकारांना वारंवार दूर सारावे लागते; ते पुन:पुन्हा डोके वर काढतच असतात; म्हणून चित्तशुद्धीची साधना आध्यात्मिक साधकाला सततच करावी लागते.
श्री अरविंद असे म्हणतात की, ''विकारांना दाबून ठेवणे अथवा विकारांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करणे (म्हणजे विकारांचे जे विषय असतात, त्यांच्यापासून लांब अंतरावर राहणे)'' या पद्धतींमुळे विकार नष्ट होणार नाहीत. ते साधकाच्या अवचेतन मनात दडून राहतील व संधी मिळताच उफाळून वर येतील. आमच्या प्रकृतीचे असे रूपांतरण आवश्यक आहे की, ज्यामुळे विनाशक, विद्रूप विकारांना अवचेतनेमध्येदेखील थारा मिळणार नाही. आणि असे रूपांतरण एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये होऊन भागणार नाही. कारण मानवजातीच्या सामुदायिक अवचेतनेतून त्या विकारांना दूर सारावयाचे असल्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या प्रकृतीचेच दिव्य रूपांतरण व्हायला हवे. म्हणूनच व्यक्तिगत सिद्धी वा मोक्षासाठी आध्यात्मिक साधना करणे इष्ट नसून ती सर्वासाठी केल्यानेच फलदायी ठरेल.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Monday, January 28, 2013
बुद्धी व तर्कापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती महत्त्वाची
योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्माडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विश्वातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळय़ांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळय़ा, अज्ञानी प्रकृतीच्या, निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत, चाचपडत झाल्यासारखा दिसतो. कारण बाह्यत: हा जड, अचेतन ऊर्जेचा, पदार्थाचाच प्रवास आहे आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते, कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे. हा सर्व प्रवास जडातून चैतन्याकडे, असंवेदनेकडून संवेदनेकडे, अनेकत्वातून एकत्वाकडे, विसंगतीतून सुसंगतीकडे, निम्न पातळीवरून उच्च पातळीकडे म्हणजे सच्चिदानंदाकडे वाटचाल करीत आहे.
तुकडोजी महाराजांनी त्यांच्या काव्यातून अशीच मागणी केली आहे.
'हे प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्गसम संसार हो
अतिउच्चतम जीवन रहे, परमार्थमय व्यवहार हो'
ज्ञानदेवांच्या पसायदानातदेखील अशाच आशयाची प्रार्थना आढळून येते. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातला मौलिक भेद असा आहे की, तार्किक बुद्धीपेक्षा वेगळय़ा पातळीवरील जाणिवेच्या प्रत्यक्ष अनुभूतीला भारतीय आध्यात्मिक दर्शनांनी मोलाचे स्थान दिले. सांख्य, जैन, बौद्ध, वेदांती, अद्वैतवादी अथवा द्वैतवादी अशा सर्वच दार्शनिकांनी केवळ बुद्धीचा कस लावून तार्किक निष्कर्ष काढण्यावर भर न देता स्वत: ध्यानधारणेच्या, योगसाधनेच्या वेगवेगळय़ा पद्धतींचा अवलंब करून आपल्या जाणिवेला एकाग्रतेने उच्चतर पातळय़ांवर केंद्रित करून जी अनुभूती त्यांना झाली, तिचे वर्णन बुद्धीच्या पातळीवर तात्त्विक मांडणीद्वारे शक्य होईल तितके केलेले आहे. बुद्ध, महावीर, कृष्ण, शंकर (आचार्य), गोरख, कबीर, नामदेव, तुकाराम ही नावे भारतीयांसाठी फक्त फिलॉसॉफर्स किंवा कवी म्हणून वंदनीय नाहीत, तर आपापल्या जीवनात खडतर तपस्येतून त्यांनी 'अ-लौकिक'असे काही अनुभवले व बाह्य विश्वात प्रसारित केले, त्यामुळे ते पूजनीय ठरले आहेत.पाश्चात्त्यांचा भर ग्रीक तत्त्वज्ञांच्या प्राचीन काळापासून बुद्धी व तार्किक विचारांवर राहिला आहे. बुद्धी कितीही सूक्ष्म, तरल व उत्तुंग झेप घेणारी असली तरी तिच्या प्राकृतिक मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक पाश्चात्त्य तत्त्वज्ञ अखेरीस अ™ोयवादाचा आश्रय घेतात. बुद्धीच्या पातळीपेक्षा वेगळा अनुभव जाणिवेत आला तरी, त्या अनुभवाला दुय्यम स्थान देऊन तार्किक बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहण्याकडेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञांचा कल असतो. भारतीय दार्शनिकांनी मात्र अनुभूतीपेक्षा दुय्यम स्थान तार्किक बुद्धीला दिले.
श्री. अरविंदांचे बालपणापासून सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. भारतातील बुरसटलेल्या धार्मिक वातावरणापासून व परंपरांपासून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशानेच त्यांच्या वडिलांनी त्यांची बालपणीच इंग्लंडला रवानगी केली. त्यांनी चुकूनही भारतीय संस्कृतीच्या संपर्कात येऊ नये, याचीही दक्षता घेतली. त्यामुळे इंग्लंडच्या वास्तव्यात श्री. अरविंदांनी केवळ पाश्चात्य तत्त्वज्ञान, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास केला. इंग्लंडमध्येच ते आयसीएसची परीक्षा इतर सर्व विषयांत उत्तीर्ण झाले. परंतु सरकारी नोकरीचा तिटकारा असल्यामुळे मुद्दाम अश्वारोहणाच्या परीक्षेकडे फिरकले नाहीत. सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात देऊ केलेली नोकरी स्वीकारून श्री. अरविंद तरुणपणी जेव्हा भारतात परतले, तेव्हा भारताच्या किनार्यावरच त्यांना प्रथम एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली. पुढे स्वातंर्त्य चळवळीतील मतवादी गटाकडे खेचून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एका बॉम्ब प्रकरणात अटक होऊन वर्षभर त्यांना तुरुंगवास घडला. त्या काळातच त्यांना सातत्याने अनेक आध्यात्मिक अनुभव येत गेले व त्यांची योग साधना अधिक वेगवान झाली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी निवडक सहकार्यांसह पॉंडिचेरी (पुदुच्चेरी) येथेच कायमचे वास्तव्य केले व तीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी तिथे एकांतात साधना केली.
पॉंडिचेरी येथील वास्तव्यात श्री. अरविंदांनी स्थापन केलेल्या आश्रमाची सूत्रे त्यांच्या पट्टशिष्या मूळ फ्रेंच नागरिक असलेल्या माताजींनी सांभाळली. त्या आश्रम जीवनात त्यांनी शेती, उद्योग, शिक्षण, व्यायाम, संगीत व कलाक्षेत्रात विविध अभिनव प्रयोग केले. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्यांनी आध्यात्मिक साधनेसाठी वज्र्य वा त्याज्य मानले नाही. म्हणूनच या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा आवाका प्रचंड मोठा वाटतो. कोणत्याही संकुचित धर्म, संप्रदायवादी, वर्ण, जातिवादी, वंशवादी अथवा राष्ट्रवादी भूमिकेस त्यांच्या अध्यात्मात मुळीच स्थान नाही. तसेच एखादी विशिष्ट अनुभूती अंतिम सत्याचे स्थान घेऊ शकत नाही, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. महावीर, बुद्ध, कृष्ण, शंकराचार्य इत्यादी महामानवांच्या अनुभूती सत्यच आहेत, परंतु त्या सत्याचा एकेक पैलू दर्शविणार्या आहेत, समग्रसत्य नव्हे, असे श्री. अरविंदांचे प्रतिपादन दिसते. परमसत्याचे एक स्वरूप स्थिर, शांत, अविचल, सर्वव्यापी ब्रह्मचेतनेचे आहे तर दुसरे स्वरूप अत्यंत गतिमान, क्रियाशील, आनंदमयी चेतनेचेही आहे. नीरव, निराकार, स्तब्ध शून्यवत् असेही परमसत्याचे आणखी एक रूप आहे. ज्याप्रमाणे पदार्थातील अणू हा स्थिर भासतो, परंतु प्रत्यक्षात प्रचंड गतिमान आहे, त्याचप्रमाणे ध्यानावस्थेतील आमच्या जाणिवेला अस्तित्वाच्या वेगवेगळय़ा पातळय़ांवर वैश्विक सत्याची वेगवेगळी अनुभूती येऊ शकते. भौतिक पातळीपेक्षा अधिक उच्चस्तरांवर अस्तित्वात असलेल्या अति-चेतन पातळय़ांवरील दिव्य सामर्थ्यांना या भौतिक पातळीवर उतरून भौतिक प्रकृतीचा एकूण प्रवासही त्याच दिशेने आहे. परंतु हा प्रवास जडातून, अवचेतनेतून, अज्ञानातून, अंधकारातून होत असल्यामुळे त्याची गती संथ व वेडीवाकडी वाटते. मानव हा भौतिक जगात परमात्म्याचाच सर्वाधिक सचेतन अंश असल्यामुळे जागरूकतेने व तळमळीने स्वत:मधील ईशत्व प्रकटवून मानव उत्क्रांतीची ही गती वाढवू शकतो, हे श्री. अरविंदांच्या योग-तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु आमच्या प्राणिक, मानसिक इच्छा, वासना तृप्त व्हाव्या म्हणून दिव्य सामर्थ्यांची भक्ती करणे वेगळे आणि परमोच्च परमात्म्याने आमच्यात प्रकटून त्यांच्या कार्याचे आम्ही स्वत:ला केवळ साधन, उपकरण होऊ देणे वेगळे. ही दुसर्या प्रकारची साधनाच अध्यात्मास अभिप्रेत आहे.
आमच्या भौतिक इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कोण्या देवाच्या, समाधिस्थ संताच्या, गुरूच्या सामर्थ्यांची पूजा करतो व त्याविषयी भक्तिभाव बाळगतो. परंतु या भावनेतून, वासनेतून केलेली पूजा, भक्ती आध्यात्मिक साधनेचा हिस्सा होऊ शकत नाही. आमच्या प्रकृतीचे त्यामुळे उन्नत रूपांतरण होऊ शकत नाही, उलट आम्ही अधिकच दुर्बल व परावलंबी होतो. मात्र अंतरात्म्याचा शोध घेऊन त्याच्या हाती सूत्रे सोपविल्यास आमची स्वभाव-प्रकृती तर उन्नत, शांत, समंजस, शहाणी, ज्ञानी, सक्षम, प्रेमळ व सामर्थ्यवान होतेच; शिवाय भोवतालच्या जगावरही त्याचे चांगले परिणाम होताना जाणवतात. म्हणून ही आध्यात्मिक साधना मानवाला दुर्बल अथवा परावलंबी करत नसून जगण्यासाठी अधिक सक्षम व स्वावलंबी बनविते.
(लेखक नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
Monday, January 14, 2013
विश्वात एकच सचेतन मूलतत्त्व अस्तित्वात आहे
मागील शतकाच्या पूर्वार्धात सुप्रसिद्ध योगी व तत्त्वज्ञ श्री. अरविंद यांनी सर्व प्राचीन भारतीय दर्शनांचा आढावा घेऊन आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पुनर्माडणी त्यांच्या .ङळषश ऊर्ळीळपश (दिव्य जीवन) या ग्रंथाद्वारे केली. त्या गं्रथाच्या आधारे आध्यात्मिक विचारसरणीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे नमूद करता येतात.
या विश्वात मूलत: एकच तत्त्व अस्तित्वात आहे. ते 'आहे' म्हणून त्याला 'सत्' म्हणायचे. ते जे एकच एक मूलतत्त्व अस्तित्वात आहे, ते जड अथवा अचेतन नसून संपूर्णत: सचेतन/ चिन्मय आहे, म्हणून त्याला 'चित्' म्हणायचे. त्याचप्रमाणे त्या मूलतत्त्वाचा स्वभाव आनंद-स्वरूप आहे, म्हणून त्याला सत्+चित्+आनंद = 'सच्चिदानंद' असे नाव दिले आहे. या सच्चिदानंदाखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात नाही, म्हणून त्याला 'आत्मतत्त्व' म्हणायचे. ईशावास्य उपनिषदाच्या भाषेत सांगायचे तर..'ते आत्मतत्त्व एकच एक, मुळीच हालचाल न करणारे, पण मनापेक्षाही वेगवान आहे. देव त्याला गाठू शकत नाहीत, मात्र त्याने देवांना केव्हाच गाठलेले आहे.'
'ते दूर आहे आणि ते जवळही आहे.
'ते या सर्वाच्या आत आणि या सर्वाच्या (विश्वाच्या) बाहेरही आहे.'
अध्यात्माच्या या कल्पनेनुसार सर्वव्यापी, सर्वातर्यामी, परंतु एकच एक असे ते आत्मतत्त्व/ परब्रह्म/सच्चिदानंद सृष्टीच्या आरंभी असंख्य झाले. जे एक होते त्याने स्वत:ला असंख्य/ अगणित रूपांत/ आकारांत खंडित करून घेतले. ते संपूर्ण सचेतन होते, त्याने स्वत:ला या असंख्य आकारांमध्ये संपूर्ण निश्चेतन/ जड करून घेतले आणि मग त्याने प्रवास सुरू केला असंख्य/ अगणित रूपांतून/ आकारांतून पुन्हा एकत्वाकडे, चैतन्याकडे आणि आनंदाकडे! सृष्टीची उत्क्रांती जडाकडून चेतनेकडे वाटचाल करीत असलेली दिसते. परंतु या सर्व जडाच्या मुळाशी, त्याच्या आत आणि बाहेरही ते आनंदमय चैतन्य गुप्तपणे विराजमान आहेच. सृष्टीच्या निर्मितीचे कारण, निमित्तही तेच आहे आणि निर्मित सृष्टीचे सारे द्रव्य/ घटक त्याच तत्त्वाचे बनलेले आहेत. निर्माता आणि निर्मिती यांच्यात द्वैत/ द्वंद्व नसून निर्माताच निर्मितीतही उतरला आहे. निर्मात्यापासून निर्मिती वेगळी नाही. चैतन्यापासून जड तत्त्व वेगळे नाही.
चैतन्यमय व एकच एक असलेल्या सर्वव्यापी आत्मतत्त्वाने अगणित जड कणांमध्ये जे स्वत:ला विभाजित करून घेतले, ते एकदम नव्हे तर टप्प्याटप्प्याने. त्याने प्रथम स्वत:तून कार्यकारी शक्तीची निर्मिती केली, जिला 'परा-प्रकृती' म्हणतात. त्या परा-प्रकृतीच्या माध्यमातून अस्तित्वाच्या अनेक पातळ्या/ लोक/ जगत् निर्माण झाले. त्यापैकी आपल्या दृष्टीस पडणारे भौतिक जगत् ही एकूण समग्र अस्तित्वाची केवळ एक पातळी आहे. भौतिक पातळीच्या आधी मानस लोक, प्राणिक लोक अशा विविध पातळ्या व त्यावरील जगतांची निर्मिती झाली. आज आमचे जे मानवी-जीवन आहे, त्यावर या सर्व पातळ्यांचा (.श्रिरपशी) व त्यातील जगतांचा (ुेीश्रवी) व शक्तींचा (.षेीलशी) प्रभाव सतत असतो. आमच्या सामान्य जाणिवेला भौतिकेतर पातळ्यांवरील अस्तित्वाचे भान नसते व म्हणून आमच्यासाठी ते सर्व 'गुह्यजगत्' आहेत. मात्र या अनेकानेक गुह्य जगतांमधून, त्यांत वास करणार्या विविध शक्तींपासून आम्ही नित्य प्रेरणा घेत असतो अथवा त्यांच्या सामर्थ्याचे नकळत 'वाहन' ठरत असतो.
भौतिकसृष्टीमध्ये प्राणाचा विकास व्हावा यासाठी प्राणिक पातळीतून भौतिक पातळीवर दबाव येत असतो. तसेच प्राणी-जीवनात मनाचा विविधांगी विकास होण्यासाठी मानस-लोकांतूनही असाच दबाव व प्रभाव कार्यरत असतो. अर्थात भौतिक पदार्थातही सुप्त रूपाने प्राण, मन इ. घटक अस्तित्वात असल्यामुळेच वरच्या लोकांतून येणारे दबाव जडातून प्राणाला व प्राणातून मनाला उमलण्यास साहाय्यभूत ठरतात.
सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश हाच आहे की, परमात्मा असंख्य रूपे व आकार घेऊन त्या सर्व वरपांगी जड व अचेतन भासणार्या रूपांमधून पुन्हा चैतन्याचा संपूर्ण विकास करुन एकत्व साधू इच्छित आहे. आमच्यापैकी प्रत्येक मानवात, पशुपक्ष्यात, वनस्पती व जड पदार्थातदेखील खोलवर तो परमात्माच दडलेला असून तो आमच्यातून प्रकटू इच्छितो. ज्याप्रमाणे आम्हाला स्वत:मधील अवचेतन अंगाचे भान नसते त्याचप्रमाणे या अति-चेतन दिव्य अंगाचेदेखील भान नसते. मात्र समग्र मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास मानवतेला स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक साहसी, निर्भय, पराक्रमी, ज्ञानी, सुंदर व प्रेमळ होण्याची तसेच इतरांसोबत एकत्व साधण्याची प्रबळ आंतरिक ओढ परमात्म्याशी असलेल्या आमच्या नेणिवेतील आंतरिक संबंधामुळेच निर्माण होते. या आध्यात्मिक दर्शनानुसार मानवी जीवनाचा हेतू व उद्दिष्ट स्पष्ट आहे. स्वत:मधील अंतरात्म्याला हुडकून काढणे, त्याच्याशी संलग्न राहण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या हाती आमच्या जीवनाची सूत्रे सोपविणे व आपल्या पूर्ण वैभवासह आमच्यातून त्या परमात्म्याने प्रकटावे व भूलोकीचे सर्व जीवन अधिकाधिक दिव्य, चैतन्यमय, संपन्न, प्रसन्न व सुसंवादी होत जावे; त्यातच जीवनाची सार्थकता आहे. प्रकृती अतिशय कठोर व अपरिवर्तनीय असून त्यामुळे जीवन दु:खद ठरते व म्हणून या प्रकृतीचा व जीवनाचा त्याग करून मानवी जीवाने मोक्षाचा वा निर्वाणाचा ध्यास घ्यावा, ही विचारसरणी श्री अरविंदांच्या आध्यात्मिक मांडणीमध्ये मुळीच समर्थनीय ठरत नाही. उलट प्रकृतीने स्वत:मध्ये परिवर्तन घडवूनच उत्क्रांतीचे इतके टप्पे पार केले आहेत.
विश्वप्रकृतीमध्येही परमात्म्याची दिव्य शक्ती गुप्तपणे कार्यरत असून प्रकृतीला अधिकाधिक लवचीक व चैतन्यमय करण्यासाठी ती दिव्य शक्ती अनेक प्रकारे झटत आहे. परमात्म्याच्या त्या दिव्य सामर्थ्याचे आवाहन करून मनुष्य स्वत:ची प्रकृती बदलण्यासाठी जर प्रयत्नरत राहिला तर त्याच्याही प्रकृतीचे दिव्य रूपांतर होऊ शकते व सोबतच विश्वप्रकृतीच्या उत्क्रांतीलादेखील त्याचा हातभार सजगपणे लागू शकतो, असे श्री. अरविंद म्हणतात.
अधिक सोप्या व व्यावहारिक भाषेत सांगायचे म्हणजे जर मला माझ्या जीवनात अडचणी असतील तर त्या अडचणी बाह्य जगातील इतर शक्तींमुळे किती व माझ्याच स्वभावातील उणिवांमुळे किती, हे मी स्वत:ला न्याहाळून तपासू शकतो. पैकी बाह्य जगामुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणी सोडविणे मला शक्य नसते. परंतु माझ्या स्वभावातील ज्या उणिवेमुळे एखादी अडचण निर्माण होत असल्याचे माझ्या लक्षात येते, ती स्वभावातील उणीव दूर करणेदेखील माझ्यासाठी सोपे काम नसते. मात्र माझ्या अंतरंगातील अंतरात्म्याशी माझी जाणीव जसजशी निगडित होत जाईल व परमात्म्याचे आवाहन करून ती स्वभावातील उणीव दूर करण्यासाठी मी जितक्या आर्ततेने त्याचे साहाय्य मागत राहील, तसतसे माझ्या स्वभावात अधिकाधिक चांगले बदल घडत जाताना आढळतील व त्याचसोबत बाह्य जगातील अडचणी मला कमी त्रासदायक ठरू लागतील. माझ्या प्रकृतीमधील हे परिवर्तन बाह्य जगाच्या प्रकृती-परिवर्तनालाही काही प्रमाणात चालना देत राहील. माझी आणि विश्वाची प्रकृती अधिकाधिक दिव्य, ज्ञानी, सशक्त, सुदृढ, लवचीक, प्रेमळ, सचेतन व आनंदमय होत जाईल.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Subscribe to:
Comments (Atom)