Tuesday, December 25, 2012
मुक्तीसाठीच माणूस कर्माची जबाबदारीने निवड करतो
सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली? आपल्या जीवनाचे काही प्रयोजन आहे काय? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तत्त्वज्ञानातून शोधण्याचा मानवाने जो प्रयत्न केला, त्यापैकी भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे व मर्यादा आपण मागील लेखांकामध्ये जाणून घेतल्या. भारतामध्ये अस्तित्वाच्या मुळाशी पोहोचण्याचे जे प्रयत्न झाले त्यांना 'दर्शनशास्त्र' असे नाव दिले. तत्त्वज्ञानाहून 'दर्शनशास्त्र' वेगळे यासाठी मानले गेले की, तत्त्वज्ञानामध्ये केवळ बुद्धीच्या आधारे तर्कदृष्टय़ा उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो. परंतु 'दर्शन' या शब्दामध्ये निव्वळ तत्त्वज्ञानापेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित अथवा गृहीत आहे. जाणिवेच्या एका उच्च अवस्थेमध्ये प्राप्त झालेले, अनुभूत झालेले ज्ञान म्हणजे 'दर्शन' अशी मान्यता भारतीय परंपरेत आहे. ध्यानमग्न अवस्थेत चेतनेच्या साहाय्याने सत्याचे जे स्वरूप प्राचीन ऋषिमुनींना, योग्यांना, तपस्वींना जाणवले त्याची त्यांनी बौद्धिक स्तरावर केलेली मांडणी म्हणजे त्यांचे 'दर्शन' होय. सांख्य दर्शनाचा उद्गाते कपिल मुनी, वेदोपनिषदांचे रचयिता मानले जाणारे वसिष्ठादी ऋषी, योगशास्त्राचा निर्माता पतंजली, सांख्य आणि योगाची वेदांताशी सांगड घालून भगवद्गीतेत समन्वयी तत्त्वज्ञान गुंफणारा श्रीकृष्ण, वेदांतील कर्मकांडाचा निषेध करून अनात्मवादाचा पुरस्कार करणारा व दु:खमय जीवनात तृष्णात्याग हाच धम्म असल्याची उद्घोष करणारा शाक्यमुनी गौतम बुद्ध, जीव आणि पदार्थ यांचे द्वैत असून त्यांचा कोणीही निर्माता ईश्वर नसल्याचे सांगणारा श्रमण तीर्थकर महावीर इत्यादी सर्व भारतीय तत्त्वज्ञ हे केवळ बुद्धिवादी पंडित नव्हते. आपापल्या जीवनात दीर्घकाळ खडतर तपश्चर्या करून त्यांना जे ज्ञान ध्यानधारणेतून प्राप्त झाले, त्याची मांडणी त्यांनी आपापल्या तत्त्वज्ञानातून केल्यामुळे त्या सर्वाच्या तत्त्वज्ञानास 'दर्शन' असे नाव प्राप्त झाले. अर्थात, यापैकी प्रत्येक महामानवास प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे संपूर्ण सत्य होय असे मानता येणार नाही. कारण आपापल्या ध्यानातून त्यांना जी अनुभूती प्राप्त झाली ती म्हणजे अस्तित्वाचे त्यांना कळलेले एक रूप मानता येईल. अस्तित्वाच्या संपूर्ण सत्याचे दर्शन त्यांना झाले असे मानणे योग्य नव्हे. शिवाय हे ब्रह्मंड आणि पृथ्वीवरील जीवन सतत विकासशील किंवा परिवर्तनशील असल्यामुळे हजारो वर्षापूर्वीचे दर्शन अपूर्ण व आंशिकच असणार.
अमर्याद सृष्टीचा एक अतिशय क्षुद्र घटक असलेला मानव त्या सृष्टीचे संपूर्ण रहस्य कधीच शोधू शकणार नाही, कारण अंशाला पूर्णाचे ज्ञान होऊच शकत नाही, असे मानणार्या तत्त्वज्ञानास 'अ™ोयवाद' म्हणतात. मात्र 'भौतिकवाद' अथवा 'अध्यात्मवाद' हे अ™ोयवादी नाहीत. भौतिकवादाच्या विचारानुसार सर्व सृष्टीचे कारण जड भौतिक पदार्थ किंवा ऊर्जा हेच असल्यामुळे यथाकाळ विज्ञानाच्या साहाय्याने सृष्टीतील सर्व रहस्यांची उकल मानवाला होणारच. अध्यात्मवाद हादेखील सृष्टीमध्ये जाणता न येण्यासारखे रहस्य आहे, असे मानत नाही. कारण प्रत्येक कणात किंवा जीवात पूर्णत्व सामावले असून स्वत:च्या शोधातून पूर्ण गवसू शकते, अशी अध्यात्मवादाची मान्यता आहे.जीव आणि पदार्थ किंवा पुरुष आणि प्रकृती असे दोन स्वतंत्र घटक सृष्टीत असून त्यांच्यात कोणतेही साम्य वा ऐक्य नाही, असे मानणार्या तत्त्वज्ञानास 'द्वैतवाद' म्हणतात. 'सांख्य दर्शन' व 'जैन दर्शन' हे द्वैतवादी आहेत. या दोन्ही दर्शनांमध्ये सृष्टी ही अनादी व अनंत मानलेली आहे. जी अभिव्यक्त झाली ती सृष्टी म्हणजेच प्रकृती आणि तिला जाणणारा, समजणारा तो पुरुष असा भेद कल्पिला आहे. पुरुषाने प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजेच 'मोक्ष' होय. इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा जो उपभोग जीव घेतो, त्याने त्याची तृष्णा वाढतच जाते. म्हणून जीवन दु:खमय होते. तृष्णा नष्ट होऊन निदरेष जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट होय, अशीच मांडणी थोडय़ाफार फरकाने बौद्ध, जैन, सांख्य या भारतीय तत्त्वज्ञानांमध्ये आढळून येते. या तिन्ही दर्शनांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. तसेच त्यांनी आत्म्याचेही अस्तित्व नाकारले आहे. परंतु तरीही ही दर्शने भौतिकवादी नाहीत, कारण जीव किंवा पुरुष हा अ-भौतिक घटक प्रकृतीपेक्षा वेगळा मानून प्रकृतीच्या बंधनातून जीवाला मुक्त करण्यावर त्यांचा भर आहे.
लोभ, भय, अहंकार, तृष्णा इ. विकांरातून मुक्त झालेला हा जीव जाईल कुठे? बौद्ध मतानुसार विश्वातील सर्व वस्तू नाशवंत किंवा अनित्य आहेत. देहाच्या मृत्यूनंतर जीवाचा नाश होत नसला तरी अविनाशी, नित्य, सनातन असे कोणतेही तत्त्व अस्तित्वात नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या देहाचे भौतिक घटक हे वैश्विक भौतिक घटकांमध्ये विलीन होतात. मात्र मानसिक किंवा भावनिक घटक मात्र पूर्णत: विलीन होत नाहीत. कर्म व त्यांचे परिणाम यांची एक साखळी पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. परंतु जो पुनर्जन्म होतो, तो अविनाशी आत्म्याचा होत नसून कर्माचे परिणाम भोगणार्या जीवाचा होतो. कर्माला कारणीभूत असणारी तृष्णा जर संपली तर जीवाच्या पुनर्जन्माचे कारणही संपुष्टात येईल व तो जीवही विलीन होईल, म्हणजे परिनिर्वाण साधेल, अशी थोडक्यात भगवान बुद्धांची मांडणी दिसते. संसाराचे हे चक्र कोणी ईश्वर वा परमात्मा चालवीत नसून कर्मामुळेच ते चक्र चालते, कारण प्रत्येक कर्माचा परिणाम हा असतोच. कर्माची प्रेरणा इच्छा, वासना (तृष्णा), हेवा यांसारख्या भावनांमधून उत्पन्न होते आणि दु:ख हाच कर्माचा मुख्य परिणाम आहे. व्यक्ती आपल्या आंतरिक साधनेद्वारे तृष्णेचा त्याग करू शकतो. त्यामुळे तो दु:खमुक्त होईल व संसारचक्रातून त्याची सुटका होईल.
प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत तपस्येवर किंवा साधनेवर भगवान महावीरानेही (जैन दर्शनाने) भर दिला. अनादी अनंत अशा आत्म्याचे व सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा ईश्वराचे अस्तित्व त्यानेही नाकारले. परंतु सृष्टी अनित्य, विनाशी आहे असे मात्र जैन दर्शन मानत नाही. त्यांच्या मते जीव भौतिक सृष्टी हे अनादी-अनंत असून कर्मबंधनापासून मुक्त झालेले जीव हे आणखी उच्च लोकांत वास करतात. मात्र पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन या जीवनापासून मुक्ती मिळविणे हेच असल्याची मांडणी बौद्ध व जैन या दोन्ही दर्शनांमध्ये समान आढळते. थोडय़ाफार फरकाने अशीच मांडणी शंकराचार्यांच्या मायावादातही आढळून येते. शंकराचार्यांनी अमर, अविनाशी आत्म्याचे व सर्वव्यापी, सनातन ब्रह्मचे अस्तित्व असल्याचे जरी प्रतिपादन केले तरी व्यक्तसृष्टी किंवा प्रकृती ही केवळ आभासात्मक माया असल्यामुळे आत्म्याचा भ्रम नाहीसा होऊन (म्हणजे तो या लौकिक जीवनाच्या मोहातून मुक्त होऊन) स्वत:च्या ब्रह्मरूपी मूळ स्वरूपात विलीन होणे, हेच त्यांच्याही मते जीवनाचे खरे उद्दिष्ट ठरते. कर्म-बंधनातून मुक्ती मिळावी या इच्छेने मनुष्य निदान नैतिक अंगाने तरी बर्यावाईटाचा विचार करून जबाबदारीने कर्माची निवड करू शकतो, हा वरील तिन्ही दर्शनांचा लौकिक अर्थाने चांगला भाग मानता येईल. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ आपण भोगत आहोत. ते पूर्वकर्म बदलणे आपल्या हाती नाही. परंतु भविष्यात किंवा पुढील जन्मी आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू नये म्हणून अनैतिक कर्म करू नये. लोभ, मोह, मद, अहंकार बाळगू नये व दुसर्या व्यक्तीला दुखवू नये; इतक्या सामान्य अर्थाने सामान्य जनांच्या पातळीवर या दर्शनांचा प्रसार झाला. मात्र जीवनापासून पलायन करणे हाच जीवनाचा खरा उद्देश होय, असा जो खोल अर्थ वरील तत्त्वज्ञानांमध्ये गृहीत आहे, तो बुद्धीला न पटणारा, विज्ञानाच्या व काळाच्या कसोटीवर न उतरलेला आहे. शून्यात अथवा ब्रह्मत विलीन होणे किंवा पृथ्वीलोक सोडून अन्य (स्वर्गासम) लोकांत वास करणे, हेच जर मानवी जीवनाचे उद्दिष्ट असेल तर जीवनाचा विविधांगी विकास का झाला? आणि जगण्याची व आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा इतकी मूलभूत स्वरूपात का टिकून राहिली?
Subscribe to:
Post Comments (Atom)
I read the above literature. It is very good and useful for all religious persons. Keep it up. Best wishes. From : Vivek Vishnu Modak, Khopoli, District Raigad
ReplyDelete