Tuesday, December 25, 2012

मुक्तीसाठीच माणूस कर्माची जबाबदारीने निवड करतो

सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली? आपल्या जीवनाचे काही प्रयोजन आहे काय? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तत्त्वज्ञानातून शोधण्याचा मानवाने जो प्रयत्न केला, त्यापैकी भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे व मर्यादा आपण मागील लेखांकामध्ये जाणून घेतल्या. भारतामध्ये अस्तित्वाच्या मुळाशी पोहोचण्याचे जे प्रयत्न झाले त्यांना 'दर्शनशास्त्र' असे नाव दिले. तत्त्वज्ञानाहून 'दर्शनशास्त्र' वेगळे यासाठी मानले गेले की, तत्त्वज्ञानामध्ये केवळ बुद्धीच्या आधारे तर्कदृष्टय़ा उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो. परंतु 'दर्शन' या शब्दामध्ये निव्वळ तत्त्वज्ञानापेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित अथवा गृहीत आहे. जाणिवेच्या एका उच्च अवस्थेमध्ये प्राप्त झालेले, अनुभूत झालेले ज्ञान म्हणजे 'दर्शन' अशी मान्यता भारतीय परंपरेत आहे. ध्यानमग्न अवस्थेत चेतनेच्या साहाय्याने सत्याचे जे स्वरूप प्राचीन ऋषिमुनींना, योग्यांना, तपस्वींना जाणवले त्याची त्यांनी बौद्धिक स्तरावर केलेली मांडणी म्हणजे त्यांचे 'दर्शन' होय. सांख्य दर्शनाचा उद्गाते कपिल मुनी, वेदोपनिषदांचे रचयिता मानले जाणारे वसिष्ठादी ऋषी, योगशास्त्राचा निर्माता पतंजली, सांख्य आणि योगाची वेदांताशी सांगड घालून भगवद्गीतेत समन्वयी तत्त्वज्ञान गुंफणारा श्रीकृष्ण, वेदांतील कर्मकांडाचा निषेध करून अनात्मवादाचा पुरस्कार करणारा व दु:खमय जीवनात तृष्णात्याग हाच धम्म असल्याची उद्घोष करणारा शाक्यमुनी गौतम बुद्ध, जीव आणि पदार्थ यांचे द्वैत असून त्यांचा कोणीही निर्माता ईश्वर नसल्याचे सांगणारा श्रमण तीर्थकर महावीर इत्यादी सर्व भारतीय तत्त्वज्ञ हे केवळ बुद्धिवादी पंडित नव्हते. आपापल्या जीवनात दीर्घकाळ खडतर तपश्चर्या करून त्यांना जे ज्ञान ध्यानधारणेतून प्राप्त झाले, त्याची मांडणी त्यांनी आपापल्या तत्त्वज्ञानातून केल्यामुळे त्या सर्वाच्या तत्त्वज्ञानास 'दर्शन' असे नाव प्राप्त झाले. अर्थात, यापैकी प्रत्येक महामानवास प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे संपूर्ण सत्य होय असे मानता येणार नाही. कारण आपापल्या ध्यानातून त्यांना जी अनुभूती प्राप्त झाली ती म्हणजे अस्तित्वाचे त्यांना कळलेले एक रूप मानता येईल. अस्तित्वाच्या संपूर्ण सत्याचे दर्शन त्यांना झाले असे मानणे योग्य नव्हे. शिवाय हे ब्रह्मंड आणि पृथ्वीवरील जीवन सतत विकासशील किंवा परिवर्तनशील असल्यामुळे हजारो वर्षापूर्वीचे दर्शन अपूर्ण व आंशिकच असणार. अमर्याद सृष्टीचा एक अतिशय क्षुद्र घटक असलेला मानव त्या सृष्टीचे संपूर्ण रहस्य कधीच शोधू शकणार नाही, कारण अंशाला पूर्णाचे ज्ञान होऊच शकत नाही, असे मानणार्‍या तत्त्वज्ञानास 'अ™ोयवाद' म्हणतात. मात्र 'भौतिकवाद' अथवा 'अध्यात्मवाद' हे अ™ोयवादी नाहीत. भौतिकवादाच्या विचारानुसार सर्व सृष्टीचे कारण जड भौतिक पदार्थ किंवा ऊर्जा हेच असल्यामुळे यथाकाळ विज्ञानाच्या साहाय्याने सृष्टीतील सर्व रहस्यांची उकल मानवाला होणारच. अध्यात्मवाद हादेखील सृष्टीमध्ये जाणता न येण्यासारखे रहस्य आहे, असे मानत नाही. कारण प्रत्येक कणात किंवा जीवात पूर्णत्व सामावले असून स्वत:च्या शोधातून पूर्ण गवसू शकते, अशी अध्यात्मवादाची मान्यता आहे.जीव आणि पदार्थ किंवा पुरुष आणि प्रकृती असे दोन स्वतंत्र घटक सृष्टीत असून त्यांच्यात कोणतेही साम्य वा ऐक्य नाही, असे मानणार्‍या तत्त्वज्ञानास 'द्वैतवाद' म्हणतात. 'सांख्य दर्शन' व 'जैन दर्शन' हे द्वैतवादी आहेत. या दोन्ही दर्शनांमध्ये सृष्टी ही अनादी व अनंत मानलेली आहे. जी अभिव्यक्त झाली ती सृष्टी म्हणजेच प्रकृती आणि तिला जाणणारा, समजणारा तो पुरुष असा भेद कल्पिला आहे. पुरुषाने प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजेच 'मोक्ष' होय. इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा जो उपभोग जीव घेतो, त्याने त्याची तृष्णा वाढतच जाते. म्हणून जीवन दु:खमय होते. तृष्णा नष्ट होऊन निदरेष जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट होय, अशीच मांडणी थोडय़ाफार फरकाने बौद्ध, जैन, सांख्य या भारतीय तत्त्वज्ञानांमध्ये आढळून येते. या तिन्ही दर्शनांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. तसेच त्यांनी आत्म्याचेही अस्तित्व नाकारले आहे. परंतु तरीही ही दर्शने भौतिकवादी नाहीत, कारण जीव किंवा पुरुष हा अ-भौतिक घटक प्रकृतीपेक्षा वेगळा मानून प्रकृतीच्या बंधनातून जीवाला मुक्त करण्यावर त्यांचा भर आहे. लोभ, भय, अहंकार, तृष्णा इ. विकांरातून मुक्त झालेला हा जीव जाईल कुठे? बौद्ध मतानुसार विश्वातील सर्व वस्तू नाशवंत किंवा अनित्य आहेत. देहाच्या मृत्यूनंतर जीवाचा नाश होत नसला तरी अविनाशी, नित्य, सनातन असे कोणतेही तत्त्व अस्तित्वात नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या देहाचे भौतिक घटक हे वैश्विक भौतिक घटकांमध्ये विलीन होतात. मात्र मानसिक किंवा भावनिक घटक मात्र पूर्णत: विलीन होत नाहीत. कर्म व त्यांचे परिणाम यांची एक साखळी पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. परंतु जो पुनर्जन्म होतो, तो अविनाशी आत्म्याचा होत नसून कर्माचे परिणाम भोगणार्‍या जीवाचा होतो. कर्माला कारणीभूत असणारी तृष्णा जर संपली तर जीवाच्या पुनर्जन्माचे कारणही संपुष्टात येईल व तो जीवही विलीन होईल, म्हणजे परिनिर्वाण साधेल, अशी थोडक्यात भगवान बुद्धांची मांडणी दिसते. संसाराचे हे चक्र कोणी ईश्वर वा परमात्मा चालवीत नसून कर्मामुळेच ते चक्र चालते, कारण प्रत्येक कर्माचा परिणाम हा असतोच. कर्माची प्रेरणा इच्छा, वासना (तृष्णा), हेवा यांसारख्या भावनांमधून उत्पन्न होते आणि दु:ख हाच कर्माचा मुख्य परिणाम आहे. व्यक्ती आपल्या आंतरिक साधनेद्वारे तृष्णेचा त्याग करू शकतो. त्यामुळे तो दु:खमुक्त होईल व संसारचक्रातून त्याची सुटका होईल. प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत तपस्येवर किंवा साधनेवर भगवान महावीरानेही (जैन दर्शनाने) भर दिला. अनादी अनंत अशा आत्म्याचे व सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा ईश्वराचे अस्तित्व त्यानेही नाकारले. परंतु सृष्टी अनित्य, विनाशी आहे असे मात्र जैन दर्शन मानत नाही. त्यांच्या मते जीव भौतिक सृष्टी हे अनादी-अनंत असून कर्मबंधनापासून मुक्त झालेले जीव हे आणखी उच्च लोकांत वास करतात. मात्र पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन या जीवनापासून मुक्ती मिळविणे हेच असल्याची मांडणी बौद्ध व जैन या दोन्ही दर्शनांमध्ये समान आढळते. थोडय़ाफार फरकाने अशीच मांडणी शंकराचार्यांच्या मायावादातही आढळून येते. शंकराचार्यांनी अमर, अविनाशी आत्म्याचे व सर्वव्यापी, सनातन ब्रह्मचे अस्तित्व असल्याचे जरी प्रतिपादन केले तरी व्यक्तसृष्टी किंवा प्रकृती ही केवळ आभासात्मक माया असल्यामुळे आत्म्याचा भ्रम नाहीसा होऊन (म्हणजे तो या लौकिक जीवनाच्या मोहातून मुक्त होऊन) स्वत:च्या ब्रह्मरूपी मूळ स्वरूपात विलीन होणे, हेच त्यांच्याही मते जीवनाचे खरे उद्दिष्ट ठरते. कर्म-बंधनातून मुक्ती मिळावी या इच्छेने मनुष्य निदान नैतिक अंगाने तरी बर्‍यावाईटाचा विचार करून जबाबदारीने कर्माची निवड करू शकतो, हा वरील तिन्ही दर्शनांचा लौकिक अर्थाने चांगला भाग मानता येईल. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ आपण भोगत आहोत. ते पूर्वकर्म बदलणे आपल्या हाती नाही. परंतु भविष्यात किंवा पुढील जन्मी आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू नये म्हणून अनैतिक कर्म करू नये. लोभ, मोह, मद, अहंकार बाळगू नये व दुसर्‍या व्यक्तीला दुखवू नये; इतक्या सामान्य अर्थाने सामान्य जनांच्या पातळीवर या दर्शनांचा प्रसार झाला. मात्र जीवनापासून पलायन करणे हाच जीवनाचा खरा उद्देश होय, असा जो खोल अर्थ वरील तत्त्वज्ञानांमध्ये गृहीत आहे, तो बुद्धीला न पटणारा, विज्ञानाच्या व काळाच्या कसोटीवर न उतरलेला आहे. शून्यात अथवा ब्रह्मत विलीन होणे किंवा पृथ्वीलोक सोडून अन्य (स्वर्गासम) लोकांत वास करणे, हेच जर मानवी जीवनाचे उद्दिष्ट असेल तर जीवनाचा विविधांगी विकास का झाला? आणि जगण्याची व आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा इतकी मूलभूत स्वरूपात का टिकून राहिली?

Friday, December 14, 2012

चैतन्याच्या अनुभूतीचे वस्तुनिष्ठ संशोधन आवश्यक

विश्वाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचारप्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वात ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवायचे आहे. ईश्वर ही एक काल्पनिक धारणा असून त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करणे निर्थक असते. ईश्वराच्या कल्पनेने, त्याच्या कोपाच्या भयाने व त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने मानवाला नैतिक वागणुकीचे वळण मिळते ही बाब काही प्रमाणात खरी असली, तरी त्यातून दांभिकताही बळावते व धार्मिक मनुष्य अधिक दांभिक असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा सत्य जाणून मनुष्याने स्वत:ची व समाजाची फसगत न करणे इष्ट ठरेल. अशा प्रकारची भौतिकवादाची थोडक्यात तात्त्विक मांडणी आहे. भौतिकवादी मनुष्य हा जसा व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित व स्वार्थपरायण असू शकतो, तसेच तो समाजशील, मानवतावादी व अत्यंत त्यागीदेखील असू शकतो. तो मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, लोकशाही राज्यव्यवस्थेचा समर्थक, हुकूमशाही किंवा सैनिकशाहीचा पाठीराखा अथवा लोकशाही, समाजवादाचा, साम्यवादाचा वा अराजकवादाचादेखील पाईक असू शकतो. सारांश, भौतिकवादी विचारसरणीमध्ये वरील सर्व आर्थिक/राजकीय विचारांना स्थान आहे. सामाजिक बाबतीत भौतिकवादी मनुष्य समाजव्यवस्था टिकून रहावी व माणसांनी एकमेकांसोबत सलोख्याने रहावे या कारणांसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धरू शकतो. तसाच तो स्वत:ला मृत्यूनंतर अस्तित्व राहणार नसल्याच्या धारणेमुळे बेबंद, चंगळवाद व अनैतिक जीवन जगण्याचेही समर्थन करू शकतो. वस्तुनिष्ठ (जलक्षशलींर्ळीश) व तर्कशुद्ध (ीरींळेपरश्र) विचार करण्याची शिस्त, ही भौतिकवादाने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी मानावी लागेल. तशी शिस्त नसली आणि आपल्याला अंत:स्फूर्तीने एखाद्या वस्तूचे वा विषयाचे आकलन झाल्यासारखे वाटले तर त्या आकलनात आपले पूर्वग्रह, स्वभावाची बैठक, प्राणिक आवेग वगैरे मिसळून व्यक्तिगणिक आकलनात फरक पडू शकतो. भौतिकवादी विचारसरणीची आमच्या मानवी समाजाला दुसरी देणगी म्हणजे विज्ञानाचा प्रसार ही होय. सर्व वैज्ञानिक भौतिकवादी विचाराचे नसतात. किंबहुना अध्र्याहून अधिक वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ हे ईश्वरावर श्रद्धा असणारेच आढळतात. परंतु मागील 3-4 शतकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भौतिकवादी विचारसरणीचे प्राबल्य पाश्चात्त्य देशांमध्ये बळावले. त्यामुळे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विचारांना मोलाचे स्थान मिळाले. ती शिस्त बाळगून सृष्टीरचनेतील नियम व त्यामागील तत्त्वे शोधून काढण्याकडे प्रगत बुद्धीच्या मानवाचा कल वाढला. त्यांनी संशोधनामध्येही अशीच शिस्त बाळगली. एखाद्या पदार्थाच्या अथवा ऊर्जेच्या विशिष्ट वर्तणुकीला जर 'नियम' म्हणायचे असेल, तर त्या पदार्थाची वा ऊर्जेची समाजन वातावरणात सर्व काळी व सर्व जागी तशीच वर्तणूक आढळून येणे आवश्यक मानण्यात आले. असे घडले तरच विज्ञानदृष्टय़ा तो नियम सिद्ध झाल्याचे मानले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करणारा वैज्ञानिक त्या निरीक्षणात स्वत:चे पूर्वग्रह, धारणा, संस्कार, इच्छा इत्यादींचे मिश्रण होऊ देत नाही. ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे वैज्ञानिक /शास्त्रज्ञदेखील याच पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टी बाळगून प्रयोग करतात व प्रयोगात आढळणार्‍या घटनांचे तर्कशुद्ध बुद्धीने विश्लेषण करतात. तसे त्यांनी केले नाही तर विज्ञान प्रगतीच करू शकणार नाही. विज्ञानाच्या घोडदौडीमुळे मानवजातीला जे अद्भुत लाभ झाले आहेत, त्यांचे श्रेय बर्‍याच अंशी भौतिकवादाला निश्चितपणे दिले पाहिजे. परंतु काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भौतिकवाद समाधानकारक अशी देऊ शकत नाही. ही अफाट सृष्टी केवळ अपघाती योगायोगांच्या लांबलचक मालिकेतून निर्माण झाली व कार्यरत आहे, हा भौतिकवादी विचार बुद्धीचे व मनाचेदेखील सर्वागीण समाधान करू शकत नाही. सभोवतालच्या व दूरवरच्या सृष्टीचे आम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले तर ही बुद्धिहीन, आंधळय़ा जड पदार्थाची/ऊर्जेची करामत वाटत नाही. वनस्पती, कीटक, पशुपक्षी व मानवात असलेले चैतन्य जडातूनच उगवले असे मानले, तरी ते चैतन्य बीजरूपाने जडात वास करत असणारच! त्याशिवाय ते उगवणार कसे? शिवाय आमच्या ज्ञानेंद्रियांना व तार्किक बुद्धीला जे कळत नाही, ते अस्तित्वात असूच शकत नाही, असे मानणे योग्य नाही. कारण मानवाच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीलाही मर्यादा आहेत. मानवाच्या व मानवसदृश प्राण्यांच्या उत्क्रांतीक्रमातील आगमनापूर्वीचे प्राणी-जगतदेखील असे म्हणू शकले असते की, तर्क-बुद्धी नावाची गोष्ट या सृष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही! आमच्या अंतर्मनाचे व मनाच्या अवचेतन भागाचे नियमन व नियंत्रण करणारी आमच्या जागृत मनापेक्षा अधिक ज्ञानी असणारी यंत्रणा कार्यरत असते, हेदेखील आपण स्वत:चे निरीक्षण केल्यास समजू शकतो. जडाच्या आधारे चैतन्याचा अधिकाधिक विकास साधणे, अशी स्पष्ट दिशा उत्क्रांतीमध्ये आढळून येते. सृष्टीच्या मुळाशी जर फक्त अज्ञानी जड तत्त्वच असते तर त्याला ही नेमकी दिशा कशी धरता आली असती? एखाद्या आंधळय़ाने धडपडत, चाचपडत, झोकांडय़ा खात वाटचाल करावी तसे उत्क्रांतीचे स्वरूप दिसते खरे, परंतु त्या वाटचालीला एक निश्चित दिशा आहे, त्यात एक सुसंगती आहे, ती कुठून आली? शिवाय प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगण्याची व वंशवद्धीची जी उपजत, मूलभूत व बलवान प्रेरणा आढळून येते, तिच्या उगमस्थानाचा व कारणाचा समाधानकारक खुलासा भौतिकवाद करत नाही. जर सृष्टीच्या मुळाशी अचेतन, जड तत्त्वच असेल, तर ते जडभौतिक तत्त्व सजीवांच्या रूपात चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यास असा आणि इतका अट्टाहास कसा करू शकेल? जगत राहण्याची व अधिकाधिक सचेतन होत राहण्याची ही आदिम प्रेरणा भौतिक पदार्थातून उगवणे शक्य वाटत नाही. पृथ्वीवर काही वेगवेगळय़ा जागी आजपावेतो असंख्य मानवांना जी इंद्रियातीत चैतन्याच्या अस्तित्वाची अनुभूती झाली आहे, त्या अनुभूतीचे अधिक वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, संशोधन व आकलन करणे आवश्यक आहे. तसे न करता उथळपणे 'तो त्यांचा भ्रम होता' असे झटकून टाकणे उचित नव्हे. विशेषत: तशा अनुभूती येणार्‍या व्यक्तींचे आंतरिक व बाह्य जीवन बदलते काय व कशा प्रकारचे ते बदल होतात, याबाबतदेखील अद्याप पुरेसे संशोधन वस्तुनिष्ठपणे झालेले आढळून येत नाही. अतिंद्रिय वा आध्यात्मिक अनुभूतींचे व ज्यांना त्या अनुभूती येतात, त्या व्यक्तींचे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे संशोधन करणे भौतिकवादी व्यक्तींना कठीण जाते. कारण तशा विज्ञाननिष्ठ संशोधनाकरिता 'ज्ञात भौतिक सृष्टीखेरीज वेगळे असे काहीही अस्तित्वात नाही' हा आपला पूर्वग्रहदेखील बाजूला ठेवावा लागतो. ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थकणांचे व ऊर्जेच्या तरंगाचे सैद्धांतिक स्वरूपात का होईना, (गणिती पद्धतीने) अस्तित्व विज्ञानाला शक्य वाटत आहे, त्या सूक्ष्म कणांचे अथवा ऊर्जा-लहरींचे अस्तित्व शे-दीडशे वर्षापूर्वी वैज्ञानिकांना माहीतही नव्हते. हिग्ज-बोसॉन (गॉड पार्टिकल) या अणूतील सूक्ष्म कणाचे अस्तित्व केवळ गणितीय आधारावर शक्य मानले जात होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तर नुकताच मिळाला. सृष्टीमध्ये आम्हाला माहीत असलेल्या तत्त्वाखेरीज इतरही तत्त्व अस्तित्वात असू शकतात, ही संभावना विज्ञानाला नेहमी गृहीत धरावी लागते. भौतिक अथवा जड पदार्थाच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाचा शोध घेताना फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण ऊर्जातरंगाच्या रूपातदेखील वावरत असल्याचे विज्ञानाला आढळून आले. त्याहून अधिक सूक्ष्मात शोध घेता-घेता कदाचित भौतिक-अभौतिक असा भेददेखील वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)