Wednesday, October 31, 2012

डॉ. जिल टेलरचे मनोवेधक अनुभव

डॉ.जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuro-scientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी नेमका काय संबंध असतो, याबाबतीत संशोधन करीत असताना वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्नव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या मेंदूची शल्यक्रिया करून लिंबाच्या आकाराची साकळलेल्या रक्ताची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर विलक्षण जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या परिणामी डॉ. टेलर सुमारे आठ वर्षानंतर पूर्ववत नॉर्मल होऊ शकल्या. त्या मेंदूतील बिघाडाच्या अवस्थेत त्यांना जे अनुभव आले त्यांचे वर्णन त्यांनी My Stroke of Insight (A Brain Scientist Personal Journey) या 2008 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे. त्यांचे हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जगभर गाजले व 2008 साली टाईम मासिकाने जगतातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला. डॉ. जिल टेलर यांचे ते मूळ पुस्तक मला अद्याप मिळाले नाही; परंतु चित्रा बेडेकर यांनी डॉ. टेलर यांच्या अनुभवांची कथा 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सादर केली आहे. चित्रा बेडेकर या स्वत: संरक्षण खात्यातील संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी पदावर होत्या व लोकविज्ञान चळवळीशीही त्या निगडित आहेत. आपल्या मेंदूचे जे वरचे आवरण असते त्याचे डावा व उजवा असे दोन अर्धगोल हिस्से असून ते दोन्ही भाग एका सेतूने एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डाव्या व उजव्या अर्धगोलांत माहितीची सतत देवाणघेवाण सुरू असते व ते एकमेकांना पूरक असे कार्य करीत असतात. मात्र ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोचलेल्या माहितीवर कशा प्रकारे संस्करण करायचे, याची प्रत्येक अर्धगोलाची कार्यपद्धती अगदी परस्परभिन्न असते. मानवी मेंदूच्या या वरच्या आवरणांमध्ये ज्या चेतापेशी .(neurons) असतात त्या इतर कोणत्याही प्राण्याच्या मेंदूत आढळून येत नाहीत. मानवी मेंदूच्या या बाह्य आवरणाला neo-cortex असे नाव आहे. आपल्या मेंदूच्या आतल्या भागातील पेशी मात्र इतर सस्तन प्राण्यांसारख्याच असतात. मानवी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांच्या भिन्नभिन्न कार्यपद्धतीचे सुरेख वर्णन चित्रा बेडेकरांनी डॉ. जिल टेलर यांच्या पक्षाघाताच्या घटनेच्या संदर्भात जे केले आहे ते त्यांच्याच शब्दांत वाचणे योग्य राहील. त्या लिहितात :''माणसाच्या मेंदूचा डावा अर्धगोल 'बुद्धिवादी' असतो. बुद्धी वापरून परिस्थितीचा सतत अर्थ लावत असतो. उलट उजवा अर्धगोल अंत:प्रेरणेने, अंत:स्फूर्तीने चालतो. डाव्याला कालप्रवाहाचं भान असतं तर उजवा वर्तमान क्षणातच मग्न असतो. डावा भाषा वापरतो, शब्दांमार्फत बोलत राहतो, उजवा नि:शब्दपणे अनुभव घेत असतो. डावा मेंदू परिस्थितीचे तुकडे करून विश्लेषण करतो तर उजव्याला समग्रतेचं सर्वसमावेशक भान असतं. डाव्या मेंदूच्या प्रेरणांच्या प्रभावाखाली आपण प्रत्येक क्षणी जगाशी व्यवहार करीत राहतो, इतरांशी शब्दबंबाळ बोलत, ऐकत राहतो, काल-आज-उद्याच्या चक्रात अविरत धावत राहतो. आपण एकटे आहोत, एकाकी आहोत, असुरक्षित आहोत आणि सतत धडपड केल्याशिवाय, स्वार्थ साधल्याशिवाय टिकू शकणार नाही असं आपल्याला वाटत असतं. जिलच्या मेंदूचा डावा अर्धगोल जेव्हा निकामी झाला तेव्हा तिला उजव्या मेंदूच्या प्रभावाखाली एक वेगळा विलक्षण अनुभव आला. जणू एक साक्षात्कार झाला! मी संपूर्ण विश्वाशी एकरूप आहे असा समग्रतेचा अफाट अनुभव तिला आला. तो कालातीत होता, 'स्व'च्या पलीकडचा होता, शब्दांच्या पलीकडचा होता. एका असीम आंतरिक शांततेचा तो अनुभव होता.'' आपलं हे उजवं मन म्हणजेच उजव्या अर्धगोलाची कार्यपद्धती कोणताही सुटा, अलग क्षण अगदी स्पष्टपणे जसाच्या तसा आठवण्याची क्षमता आपल्याला देतं. आपल्या अवतीभवतीच्या गोष्टीचं एकमेकांशी कसं नातं आहे हे लक्षात ठेवण्यासाठीच आपल्या या उजव्या मनाची म्हणजेच मेंदूच्या उजव्या अर्धगोलाची योजना झालेली आहे. निरनिराळ्या वस्तूंमधल्या सीमारेषा धूसर होऊन मनाने चितारलेलं एकच विशाल, व्यामिश्र चित्र आपण आठवू शकतो. दृश्य, हालचाली, गुणधर्म यांची सरमिसळ असणारं प्रत्येक क्षणाचं ते परिपूर्ण चित्र असत.ं आपल्या उजव्या मनाला वर्तमान क्षणाशिवाय दुसरा कोणताच काळ ठाऊक नसतो. उजव्या मनासाठी प्रत्येक क्षण विविध संवेदनांनी ओतप्रोत भरलेला असतो. आनंदाचा अनुभवसुद्धा त्या वर्तमान क्षणातच नांदत असतो. आपल्यापेक्षा विशाल असणार्‍या कशाशी तरी आपण जोडलेले आहोत याचा अनुभवसुद्धा वर्तमान क्षणातच येत असतो. आपल्या उजव्या मनासाठी आदिअंतविरहित, समृद्ध असा वर्तमान क्षण म्हणजेच सर्व काही असत.ं कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे करण्यासाठी नेमून दिलेली नियम आणि बंधनांची जी चौकट असते ती उजव्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसते. त्या चौकटीबाहेर अंत:प्रेरणेने विचार करायला हे मन मुक्त असतं. प्रत्येक नव्या क्षणासोबत येणार्‍या शक्यतांचा हे उजवं मन सर्जनशीलपणे वेध घेतं. कोणत्याही अडथळ्याशिवाय, न्यायनिवाडय़ाशिवाय आपल्यातल्या कलात्मक प्रवाहांना मुक्तपणे हे मन वाहू देतं. उजव्या मनासाठी वर्तमान क्षण म्हणजे जणू प्रत्येक जण, प्रत्येक वस्तू एकात्मिकपणे एकमेकांशी जोडलेले असण्याची वेळ असते. मानवजातनामक एका व्यापक कुटुंबाचे आपण सर्व सदस्य असल्याप्रमाणे उजवं मन सर्वाना समान लेखतं. विश्वातल्या या सुंदर ग्रहावर माणसाचं जीवन टिकून राहण्यासाठी माणसामाणसांतल्या नात्याची या मनाला जाणीव असते. सर्व माणसांमधली सामाईकता हे मन ओळखून असतं. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कशी जोडलेली असते आणि आपण सर्व जण एकत्र येऊन कसं एक पूर्णत्व आकारलेलं असतं याचं एक विशाल रेखाटन या मनाला दिसत असतं. दुसर्‍याविषयी सहानुभाव वाटण्याची, त्याच्या भूमिकेत शिरून त्याच्या भावना जाणण्याची क्षमता आपल्या मेंदूच्या उजवीकडच्या कॉर्टेक्सच्या पुढच्या भागामुळे आपल्याला लाभलेली असते. 'यांच्या तुलनेत आपल्या मेंदूचा डावा अर्धगोल म्हणजे अगदी दुसरं टोक असतं. माहितीवर संस्करण करण्याची त्याची तर्‍हासुद्धा संपूर्णपणे वेगळी असते. उजव्या अर्धगोलाने निर्माण केलेल्या प्रत्येक समग्र, संपन्न क्षणाला कालक्रमानुसार एकत्र गुंफण्याचं काम डावा अर्धगोल करतो. हा क्षण ज्या तपशिलांनी बनलेला आहे त्याची तुलना क्रमाने आधीच्या क्षणातल्या तपशिलांशी तो करतो. सलगपणे, पद्धतशीरपणे त्या तपशिलांची जुळणी करून आपला डावा अर्धगोल वेळ किंवा काळ ही संकल्पना तयार करतो. त्यामुळेच भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ अशी त्या क्षणांची विभागणी आपण करत असतो. अशा कालदर्शक रचनेमुळे कोणती गोष्ट कशाच्या आधी घडायला हवी हे आपण ठरवू शकतो. म्हणजे आपल्या बूट आणि मोज्यांकडे तर बूट घालण्याआधी मोजे घालायला हवेत हे ठरवायला आपला डावा अर्धगोल मदत करतो. कोणत्याही कृतीचं निगामी पद्धतीने (deductive method) तो आकलन करून घेत असतो. म्हणजे 'अ' हा 'ब' पेक्षा मोठा आहे, 'ब' हा 'क' पेक्षा मोठा आहे. म्हणून 'अ' हा 'क' पेक्षा मोठा आहे असं निगामी तर्कशास्त्र आपला डावा अर्धगोल वापरत असतो. मानवी मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीबाबत डॉ. जिल टेलर यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचे चित्रा बेडेकर यांनी केलेले आणखी वर्णन आपण पुढील लेखात पाहू. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

Thursday, October 18, 2012

'आत्मभान' हे मानवाला मिळालेले विशेष वरदान

जड पदार्थापासून मानवापर्यंत जी पृथ्वीवर उत्क्रांती झाली तिचे स्थूल निरीक्षण करता असे म्हणता येईल, की सुरुवातीस अचेतन, अबोध, निरानंद असलेला निसर्ग सजीव रूप घेऊन अधिकाधिक सचेतन, अधिकाधिक संवेदनशील, ज्ञानी आणि अधिकाधिक आनंदी होत गेला. यापैकी 'आनंद' या शब्दाला अनेकांचा आक्षेप असू शकतो. कारण सजीवांच्या जीवनात धडपड, कष्ट, वेदना व दु:ख कदाचित आनंदापेक्षा अधिक आहेत. परंतु स्वाभाविक प्रेरणा तपासली असता ती आनंदप्राप्तीचीच आहे, असे म्हणावे लागेल. जगण्यात आनंद नसता किंवा अधिकाधिक आनंदप्राप्तीसाठी जगणे नसते, तर जगणे ही मूलभूत प्रेरणा म्हणून टिकू शकली नसती. आधुनिक मानवीमनाने बरीच विकृत वळणे घेऊन जगण्यातला नैसर्गिक आनंद गढूळ करून टाकला ही बाब वेगळी. परंतु आहार, निद्रा, मैथुनासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याबरोबर जो भाव पशुपक्षी व निसर्गापासून अद्याप फार दूर न गेलेल्या मानवातही उमटतो तो आनंदाचाच असतो. इतकेच काय, लहान बालकेसुद्धा खूप भूक लागली नसेल, झोपेला आले नसतील व शारीरिक व्यथा/वेदना नसेल तर सर्वकाळ आनंदीच असतात. विविध इंद्रियांकरवी स्वत:चे विविध पैलू जाणणे, स्वत:चाच विविध प्रकारे उपभोग घेणे हेही उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत राहिला. स्वत:चे रूप न्याहाळण्यासाठी त्याने सजीवांच्या रूपात दृष्टी विकसित केली. नाद ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, गंधासाठी नाक, चवीसाठी जीभ व आत स्रवणार्‍या ग्रंथी असे स्वत:चाच आस्वाद अनेक अंगांनी घेण्यासाठी निसर्ग सजीवसृष्टीच्या माध्यमातून उमलत गेला. विकसित होत गेला. स्वत:च स्वत:चा भक्षक रूपाने उपभोग घेत राहिला व स्वत:च स्वत:चे भक्षही झाला. सजीवांमध्ये उत्क्रांतिक्रमात विकसित होत गेलेल्या प्रत्येक इंद्रियाला आनंदाचीच ओढ असते. जे अन्न आनंद देत नाही ते जिभेला नकोसे वाटते. जो नाद आनंद देत नाही तो कानांना कर्कश वाटतो. जो स्पर्श पुलकीत करत नाही तो त्वचेला असह्य वाटतो. जे दृश्य आनंददायी नसते ते डोळ्यांना बघवत नाही. असे म्हणतात, की सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते जाणण्याच्या साधनांचा विकासच उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत आहे. इंद्रियांच्या विकासापाठोपाठ किंवा सोबतच मनही उगवले व विकसित झाले. उत्क्रांतीच्या वरच्या पातळीवरील मनुष्येतर प्राण्यांमध्ये भावभावना व विचार करण्याची क्षमता कमीअधिक प्रमाणात निश्चितच आढळून येते. परंतु मानवी पातळीवर उत्क्रांतीने झेप घेतली. त्यातून मनाचा भव्य व विविधांगी विस्तार जो झाला त्याने फारच वरचा टप्पा गाठला. आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) हा मानवात असलेला व मानवेतर पशूंमध्ये अभावाने आढळणारा विशेष गुण आहे. मनुष्येतर प्राणी बहुधा त्यांच्या नैसर्गिक उपजत प्रेरणांनी संचालित असे जीवन जगतात. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला मात्र उपजत प्रेरणा कमी व बुद्धी म्हणजेच शिक्षणकौशल्य व विचारक्षमता अधिक मिळाली. इतर प्राण्यांची पिले जन्मत:च किंवा जन्मल्यावर लवकरच स्वत:चे अन्न मिळविण्यास सक्षम होतात. इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मानवाचे मूल मात्र सर्वाधिक काळ परावलंबी असते. परंतु त्यांचा मेंदू इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मानवाच्या या परावलंबी बालकांच्या रक्षण-पोषणासाठी मानवाला सामूहिक जीवनपद्धतीचा अंगीकार करावा लागला. समूहाला भाषेची गरज असते. कारण भाषेशिवाय समूहातील व्यक्ती एकमेकांशी निगडित कसे राहणार? आधी इशार्‍यांच्या स्वरूपात असलेली भाषा हळूहळू ध्वनी, शब्द व वाक्यरूपात विकसित होत गेली. भाषेच्या विकासासोबतच विचारक्षमताही आपोआप विकसित होत गेली किंवा विचारक्षमतेमुळे भाषा विकसित होत गेली, असेही म्हणता येईल. मानवेतर प्राण्यांना भोवतालच्या सृष्टीचे भान असते. परंतु स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे व स्वत:मधील वासना-भावना-इच्छा-विचार यांचे वेगळे भान त्यांना नसते. असे आत्मभान हे मानवाला मिळालेले विशेष वरदान म्हणता येईल. अर्थात, आधुनिक साहित्यात आत्मभान हा शाप मानणारा एक प्रवाह आहे. परंतु मनाने निरोगी असणार्‍या कोणत्याही मानवाला आत्मभान हे वरदानस्वरूपच वाटावे. आपणच आपल्याला आतूनबाहेरून पाहता येणे व आपण तसे पाहत आहोत किंवा पाहू शकतो याचीही स्वतंत्रपणे जाणीव असणे म्हणजे आत्मभान! स्वत:ला पाहणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा, वासना, विचार, भावना वगैरे न्याहाळता येणे व समजता येणे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे तर एखादी वासना देहात/मनात उत्पन्न होणे ही एक बाब व अशी वासना माझ्यात उत्पन्न झाली आहे हे समजणे व मी हे समजतो आहे याचेही भान असणे ही दुसरी बाब. पहिला प्रकार सर्व प्राण्यांत आढळेल. दुसरा प्रकार मात्र फक्त मानवांतच दिसून येतो. भोवतालच्या सृष्टीला समजून घेण्यासाठी, अन्न मिळविण्यासाठी व प्रतिकूल निसर्गावर मात करण्यासाठी मानवाला उपजत प्रेरणांपेक्षा विचारशक्तीचा उपयोग अधिक करावा लागला. इतर प्राण्यांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो, की या गोष्टींसाठी प्राण्यांना निसर्गानेच उपजत प्रेरणा (इन्स्टिक्ट) बहाल केल्या आहेत किंवा उत्क्रांतीच्या ओघात प्रत्येक प्राणिजातीच्या सामुदायिक प्रकृतीमध्ये त्या उपजत प्रेरणा विकसित होत गेल्या असाव्यात. मानवी मुलाला मात्र उपजत प्रेरणांच्या अभावी शिक्षणावर अधिक भर द्यावा लागतो. अगदी खाद्यपदार्थापासून हे शिक्षण सुरू होते. आपल्या देहाला पोषक खाद्य कोणते व घातक कोणते, याबाबत मानवेतर प्राणी जन्मत: अधिक समंजस असतात. मानवाचे मूल मात्र दिसेल ती वस्तू तोंडात टाकू पाहते. परंतु निरीक्षण, अनुभव-विश्लेषण, निष्कर्ष इ. पद्धतींनी मानवी बुद्धी विकसित होत गेली. निरीक्षण-विश्लेषण-तर्कसंगती-निष्कर्ष हे बुद्धीचे गुण आहेत. पूर्वग्रहरहित, अनाग्रही, शुद्ध विवेकशील विचार ( ठशरीेप) ही निसर्गाने मनाच्या स्वरूपात गाठलेली उत्क्रांतीमधील सर्वोच्च अवस्था आहे. परंतु ती अवस्था जरी निसर्गाला मानवी देहात गाठता येत असली तरी फारच तुरळक प्रमाणात ती मानवजातीत आढळते. याचे महत्त्वाचे एक कारण बहुधा असे असावे, की मानवाला उत्क्रांतीच्या आधीच्या टप्प्यांचेही ओझे वाहावे लागते. म्हणजे त्याची विवेकीबुद्धी त्याला काहीही सांगत असली तरी त्याचा पदार्थमय देह, त्या देहाच्या मर्यादा, त्या देहातील जगण्याची व पुनरुत्पादित होण्याची धडपड करत असलेला प्राण, त्या अनुषंगाने येणारे इच्छांचे, वासनांचे आवेग, नैसर्गिक उपजत प्रेरणेपासून काहीसे दुरावल्यामुळे दोलायमान असलेले, विकृतीकडे सहज झुकणारे व आत्मभानामुळे 'अहं'चा परिपोष करू पाहणारे मन हे इतर तत्त्व त्याला अन्यान्य दिशांनी ओढू पाहतात व या सर्वापासून तटस्थ होऊन जगता येणे दुष्कर वाटते. अनेक महामानवांनी मनाची अत्यंत विवेकशील बुद्धीचे वैभव प्रकट करणारी अवस्था निश्चितच गाठली आहे. मात्र देहाच्या प्राणिक वासना व भावभावनांच्या आणि मनबुद्धीच्या वेगवेगळ्या मागण्यांमध्ये संतुलन कसे साधावे, हा यक्षप्रश्न मानवजातीकडून अद्यापही उत्तराची अपेक्षा बाळगून आहे. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

Saturday, October 6, 2012

मनात साठविलेलं काहीही पुसलं जात नाही

मानवी मनाचा आवाका, खोली व व्याप्ती अतिप्रचंड असल्याचे आपण मागील लेखात पाहिले. एकतर जे गुणसूत्र जीन्स (सशपशी)च्या रूपात आपल्याला पितरांकडून मिळतात त्यातच पृथ्वीवरील सजीव उत्क्रांतीचे गडद अनुभव साठविलेले असतात. जे आपल्या मनात समाविष्ट होतात. शिवाय असे म्हणतात, की अगदी जन्मल्यापासून आपण डोळ्यांनी जे जे पाहतो, कानांनी जे जे ऐकतो, त्वचेने जे जे स्पर्श अनुभवतो, नाकाने जे जे वास घेतो व जिभेने ज्या ज्या चवी अनुभवतो ते सर्व काही आपल्या मनात साठविले जाते. काहीही पुसल्या जात नसतं. फक्त आपल्या जागृत मनाला त्यांची विस्मृती होते. मात्र सर्व आठवणी आपल्या सुप्त मनात साठविल्या जातात. याखेरीज सर्व वासना, भावना, विचार, कल्पनादेखील सुप्त मनात साठविलेल्या असतात. याचाच अर्थ, ज्याचे आम्हांला भान असते ते आमचे जागृत मन. हे आमच्या मनाचे समुद्रातून वर आलेल्या हिमनगांसारखे अगदी वरवरचे टोक असते आणि खाली पसरलेल्या अथांग सुप्त/ अवचेतन मनाचा आम्हांला पत्ताच नसतो. कदाचित आमच्या सुप्त मनाचा हा मोठा हिस्सा आतल्याआत मानवजातीच्या सामुदायिक सुप्त मनाशीही जोडलेला असू शकतो. निसर्गाचे असेही स्वरूप आहे, जे आमच्या मर्यादित दृष्टीला दिसत नाही. दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेच आमच्या दृष्टीचा विस्तार करून आम्ही सृष्टीच्या महाकाय व सूक्ष्म रूपाचे काही अंश पाहू शकतो. तार्किक बुद्धिमत्तेच्या/गणिताच्या साहाय्याने उर्वरित सृष्टीबाबत आडाखे बांधू शकतो. सृष्टीत असेही ध्वनी आहेत जे आमचे कान ऐकू शकत नाहीत. असे गंध आहेत ज्यांचा आमच्या नाकास पत्ता लागत नाही. भौतिक शरीराच्या या मर्यादा आहेत. आमचे डोळे अतितीव्र प्रकाशकिरणे सहन करू शकत नाहीत. आमचे कान तीव्र ध्वनिलहरी सहन करू शकत नाहीत. आमच्या जागृत मनालाही प्रकृतीने विस्मृतीचा वर दिलेला आहे अन्यथा ते मनातला प्रचंड गोंगाट सहन करू शकले नसते. परंतु आमच्या जाणिवेच्या पलीकडे आमच्या सुप्त/अवचेतन मनात एक अशी आमच्या जागृतावस्थेपेक्षा ज्ञानी यंत्रणा निश्चितच कार्यशील असावी जी त्या सुप्तमनाच्या प्रचंड गोदामातून वेळोवेळी, सतत आमच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला साजेशा आठवणी, कल्पना, भावना, गुणी विचार हुडकून काढते व जागृतावस्थेकडे पाठवून देते. ही यंत्रणा आमच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेपण संघटित ठेवते. अशी यंत्रणा नसती तर आपण सर्व वेडे झालो असतो किंवा असेही म्हणता येईल, की ज्या मानवाच्या अवचेतन मनातील अशी निवड व संघटन करणारी यंत्रणा विस्कळीत होते, कमजोर होते अथवा नष्ट होते ते वेडे होतात. अशीच ज्ञानी यंत्रणा आमच्या देहाची निर्मिती, पोषण व विकासात गुंतलेली असल्याचे आपण पूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. ज्या यंत्रणेची संपूर्ण कार्यपद्धती आम्हांला अजून समजलेली नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, पिंड, व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असते. ते त्याने निवडलेले नसते. त्याच्यात प्रवाहित झालेल्या पितरांच्या गुणसूत्रांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटा हिस्सा व्यापला असतो. पर्यावरण व संस्कारांनी आणखी एक छोटा हिस्सा तयार होतो. परंतु त्याला त्याच्या सख्ख्या भावंडांपासूनही वेगळे व्यक्तिमत्त्व, स्वभाव प्रदान करणारा व्यक्तीच्या स्वभावाचा मोठा हिस्सा कुठून व कसा निर्माण होत असेल? आणि कशासाठी? मानवीमनाला म्हणजे जागृत मनाला बुद्धीची संगत लाभली आहे. अमूर्त स्वरूपात विचार करण्याची क्षमता हे बुद्धीचे एक लक्षण आहे. आमची भाषा हे या गुणाचे उत्तम उदाहरण आहे. 'राम' ही दोन अक्षरे खरेतर नुसत्या रेघोटय़ा आहेत. परंतु ती दोन अक्षरे एकत्र वाचली अथवा ऐकली, की आमच्या कल्पनेत धनुर्धारी, एकवचनी, एकपत्नीव्रती, त्यागी, पराक्रमी असा अवतारी पुरुष उभा ठाकतो. त्या दोन अक्षरी रेघोटय़ा म्हणजे त्या महामानवाचे अमूर्त रूप ठरतात. अमूर्त विचार करण्याच्या या क्षमतेने तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व गणितासारख्या शास्त्रांच्या रूपाने अतिउंच भरार्‍या मारल्या असून मानवाचा फार मोठा भौतिक व सांस्कृतिक विकास साधला आहे. भोवतालच्या वस्तूंची, घटनांची परस्पर संगती लावण्याचा व कारणे आणि परिणामांची संगती लावण्याचा प्रयत्न करणे हेही बुद्धीचे लक्षण मानले जाते. तसेच तर्काद्वारे निवाडा करणे, योग्य-अयोग्य ठरविणे, नियोजन करणे, शिकणे हीदेखील बुद्धीची कामे मानली जातात. आमच्या सचेतन, जागृत मनाच्या धारणा, पूर्वग्रह, श्रद्धा, संस्कार, आम्ही ज्या पाळत आलो त्या परंपरा व सामाजिक संस्थात्मक रचना यांना जाणीवपूर्वक बदलविण्याची क्षमता बुद्धी आम्हांला प्रदान करते. परंतु अवचेतन मनाला व आमच्यातील वासनांना, भावनांना, कल्पनांना जोश, आवेश, आवेग पुरविणार्‍या प्राणाला नियंत्रित करणे बुद्धीला फारसे जमत नाही. एकतर उत्क्रांतीत त्यांचे स्थान बुद्धीच्या अगोदरचे असल्यामुळे जोमदार, आवेशपूर्ण, आवेगी व भरदार अशा नाटय़पूर्ण प्राणिक मनाची आम्हांला चटक लागलेली आहे किं वा त्याचेच दुसरे रूप म्हणजे हताश, उदास, खिन्न व भकास जे असते त्याचेही आमच्या अवचेतन मनाला मोठे आकर्षण असते. (त्यामुळेच बेगम अख्तर, तलत महमूद, मेहदी हसन किंवा गुलाम अलींनी सुरेल, पण उदास स्वरात गायलेल्या उर्दू शायरांच्या पराभूत मनोवृत्तीच्या गजला क्रांतिकारकांनादेखील आवडतात.) बुद्धीमध्ये असा आवेग अथवा हताशपणा नसल्यामुळे ती योग्य-अयोग्याचा निवाडा अधिक चांगला करू शकते. पण त्यासाठी तिला अधिकाधिक सचेतन होत जाणार्‍या मनाची व बलवान परंतु शांत प्राणाची साथ मिळावी लागते.जाणीव हा आमच्या अस्तित्वाचा आणखी वेगळाच घटक असावा. जाणीव (उेपीलर्ळेीीपशी) ही स्वतंत्र वस्तू नसून मेंदूच्या माध्यमातून घडणारी एक प्रक्रिया आहे असे बहुतांश वैज्ञानिक मानतात. प्राण-मन-बुद्धी यांचेदेखील प्रक्रियांच्या स्वरूपातच विश्लेषण व अध्ययन करण्याकडे विज्ञानाचा कल आहे. परंतु एक गंमत म्हणून आपण एक प्रयोग करून पाहू शकतो. बाहेरच्या जगातून चित्त काढून स्वत:वर केंद्रित करून पाहावे. त्यासाठी पद्मासनासारखे कठीण आसन लावून बसण्याची गरज नाही. परंतु मन सैरभैर होऊ नये अशा तत्पर सुखासनात साधी मांडी घालून जरी एकाग्रतेने स्वत:कडे पाहत राहिलो तरी आपली जाणीव ही शरीराच्या सर्व अवयवांमध्ये, मनाच्या भावनांमध्ये, विचारांमध्ये वगैरे पसरली, विखुरली असल्याचे लक्षात येते. दोन्ही स्तनाग्रांना जोडणार्‍या रेषेच्या मध्यभागी अथवा टाळूवर चित्त एकाग्र करत राहिलो तर हळूहळू ही विखुरलेली, पसरलेली जाणीव त्या ठिकाणी एकवटू लागते. ती आपल्याला हळुवारपणे छातीत खोलवर अथवा टाळूच्या वर ढकलू पाहते. तिचे स्वतंत्र अस्तित्व तर जाणवतेच, परंतु ही जाणीव जेव्हा पलटून स्वत:लाच निरखू लागते तेव्हा एक विशेष आनंद शरीरात, मनात पसरू लागतो. हा अनुभव मानवजातीसाठी नवीन नसून लक्षावधी मानवांना जाणिवेची अशीच अनुभूती वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली आहे. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)