Wednesday, August 29, 2012

जगणे आणि जगविणे ही आदिम प्रेरणा

जड पदार्थातून व जडाच्या आधारे उगवलेले जीवन क्षणभंगुर असते. पदार्थमय देहात दीर्घकाळ प्राण टिकू शकत नाही. त्यामुळे प्राणाचा अथवा जीवनाचा विकास होण्यासाठी जगण्याची व प्रजातीच्या पुनरुत्पादनाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) सर्व सजीवांच्या अंतरंगात दृढ होणे गरजेचे होते. जीवनाचा विकास म्हणजे अधिकाधिक वाढत्या प्रमाणात सृष्टीचा बोध होण्याची, सृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची व अनेक प्रकारे उपभोग घेण्याची प्रक्रिया. वैज्ञानिक असे सांगतात, की जर एखाद्या जीवाणूवर संकट आले म्हणजे तो नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तो जीवाणू स्वत:मधील 'डीएनए' रेणू भोवतालच्या वातावरणात विखरून टाकतो आणि आजूबाजूचे जीवाणू लगेच त्या विखुरलेल्या 'डीएनए' रेणूंना स्वत:मध्ये शोषून घेतात. 'डीएनए'ची ही देवाणघेवाण कल्पनातीत वेगाने होत राहते व काही महिन्यांतच संपूर्ण पृथ्वीवरील जीवाणूंच्या डीएनए रचनेत काही बदल घडून येतात, जे त्यांना संकटांचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनवितात. त्यामुळेच कालपर्यंत प्रभावी ठरलेले अँण्टिबायोटिक औषध अथवा कीटकनाशक आज निष्प्रभ ठरल्याचा अनुभव येतो. म्हणजेच जगणे व स्वत:ची प्रजाती वाढविणे या सर्व सजीवांच्या मूलभूत प्रेरणा आहेत. त्या नसत्या तर पृथ्वीवर जीवनाचा विकासच झाला नसता. शिवाय आपल्या देहाच्या पोषणासाठी, रक्षणासाठी व देहाच्या पुनर्निर्मितीसाठी देहाबाहेरील पर्यावरणातून पोषक घटक (पदार्थ व ऊर्जा) देहाच्या आत ओढून घेणे, त्या घटकांवर देहांतर्गत प्रक्रिया करून जीवपेशी बनविणे व नको असलेले घटक पुन्हा विष्ठेच्या रूपात बाह्य पर्यावरणात टाकून देणे (जी विष्ठा इतर कोणत्यातरी सजीवाचे अन्न असते) हे कार्य प्रत्येक सजीव अखंड करीत राहतो. भोवतालच्या पर्यावरणातील संभाव्य बदलांचा अंदाज घेऊन अनुकूल काळातच अन्नाचे साठे जमवून ठेवण्याची अथवा पाऊस-वार्‍यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी भक्कम निवार्‍याची तजवीज करण्याची कल्पकबुद्धीही मुंगीसारख्या क्षुद्र सजीवांमध्येदेखील आढळून येते. अर्थात, 'पावसाळ्यापूर्वी आपण अन्न साठवून वारुळाची डागडुजी केली पाहिजे' असा माणसारखा विचार कोणतीही एक मुंगी करू शकत नसेल. परंतु 'मुंगी' या प्रजाती (स्पेसीज)मध्ये ते शहाणपण उत्क्रांतिक्रमात जगण्याच्या व वृद्धिंगत होण्याच्या मूलभूत प्रेरणेतून पर्यावरणीय संकटांना तोंड देता देता विकसित झाले असणार. आमच्या घराच्या मागील भिंतीच्या आश्रयाने एक वेल वर चढत गेली. खोलीच्या खिडकीइतकी उंची होताच त्या वेलीने खिडकीच्या आतून गजाला वळसा घातला व पुन्हा उंची वाढल्यावर दुसर्‍याही वरच्या गजाला वळसा घातला. स्वत:चा आधार भक्कम करण्याचे हे 'शहाणपण' वेलीत प्रकटले. माझ्या घराच्या मागील बाजूचे तारेचे कम्पाउंड तुटले होते. मागच्या सर्व्हिस गल्लीतून डुकराची एक गर्भार मादी आमच्या परसदारी असलेल्या झुडपामध्ये मोठा खड्डा स्वत:च्या पायांनी करू लागली. सुरुवातीला हाकलले तर ती पळून जायची. परंतु जसजसे तिचे दिसत भरत आले तसतशी ती धीट व आक्रमक होत गेली. खड्डा करून तिने त्यात पाचोळा अंथरला व पिलांना जन्मही दिला. पिले जन्मल्यावर ती अधिकच आक्रमक होऊन त्यांचे संरक्षण करीत होती. पुढे पिले चालू लागून स्वतंत्र झाल्याबरोबर या डुकरिणीची सर्व आक्रमकता लोप पावली व ती हाकलल्यावर घाबरून पळू लागली. स्वत:च्या प्रजातीची वृद्धी व्हावी यासाठी प्राण्यांची नित्याची प्रकृतीदेखील प्रसंगविशेषी कशी बदलते व असहाय अवस्थेतील पिलांचे रक्षण करण्यासाठी एरवी भित्रा स्वभाव असलेली मादी- माता कसा चंडिकेचा अवतार धारण करते याची असंख्य उदाहरणे प्राण्यांमध्ये आढळून येतात. उत्क्रांतीच्या खालच्या टप्प्यांतील सजीवांच्या प्रजातीतील प्रत्येक जीवाचे स्वत:चे वेगळेपण (त्या प्रजातीतील इतर जीवांपेक्षा) प्रकटताना दिसत नाही. त्या-त्या प्रजातीची एकूण सामुदायिक प्रकृती जगण्याच्या ओघात अधिक शहाणी होत गेली. व्यक्तिगत जीवांची नव्हे, असे म्हणता येईल. मात्र उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यात म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये मात्र प्रजातीतील वैयक्तिक जीवांमध्येदेखील स्वत:चे वेगळेपण व वैशिष्टय़च उमलू लागले. सर्व गायी साधारणपणे सारख्याच दिसत-वागत असल्या तरी प्रत्येक गायीच्या रूपात व स्वभावात इतर गायींपेक्षा वेगळेपण कसे असते हे आपण जाणतोच. असे डास अथवा मुंग्यांच्या बाबतीत म्हणता येत नाही. निर्जीव व सजीवांमधला एक महत्त्वाचा फरक वैज्ञानिक असाही सांगतात की, आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर त्याची प्रतिक्रिया काय होईल याचा अचूक अंदाज करता येतो. परंतु एखाद्या कुर्त्याला लाथ मारली तर त्याच्या प्रतिक्रियेचा अचूक अंदाज करणे अशक्य असते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर लाथ मारल्यावर दगड किती दूर जाऊन पडेल हे न्यूटनच्या भौतिकीय सिद्धान्ताच्या आधारे लाथेतील जोर व दगडाचे वजन माहीत करून अचूक वर्तविता येते. कारण त्या लाथेमुळे दगडाच्या आतील संरचने (स्ट्रक्चर)मध्ये बदल होत नसतो. परंतु सजीव प्राण्याला लाथ बसल्यावर त्याच्या अंतरंगातील एकूण संरचनेत काही बदल होऊ लागतात व त्या बदलांसह त्याची प्रतिक्रिया घडते. भोवतालच्या जगाकडून घडणारी क्रिया ही सजीवांच्या आतील संरचनांमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरू शकते. परंतु ते बदल नेमके कशा स्वरूपाचे असावे हे त्या बाह्य जगाला ठरविता येत नाही. क्रियेला प्रतिसाद देणार्‍या सजीवाची एकूण प्रकृती ते ठरविते. व्यक्तिस्वातंर्त्याची ही प्राथमिक सुरुवात आहे भोवतालच्या पर्यावरणाशी आपले जीवन सुसंगत करण्याकरिता सर्व सजीव प्रजातींच्या प्रकृतीमध्ये उत्क्रांतीच्या ओघात बदल होत गेले. हे बदल त्यांनी ठरवून जाणतेपणी केलेले नाहीत. परंतु ही यांत्रिकपणे अथवा अपघाताने घडलेली प्रक्रिया असावी, असेही म्हणता येत नाही. जगणे व आपली प्रजाती वृद्धिंगत करणे या आदिम प्रेरणा सजीवांमध्ये इतक्या बलवान आहेत की, जगणे व प्रजा वाढविणे शक्य व सुसह्य होण्यासाठी प्रकृतिपरिवर्तन ही अपरिहार्य व क्रमप्राप्त बाब ठरत गेली. खरे पाहता, जगणे व आपल्या प्रजातीची संख्या वाढविणे या दोन वेगळ्या प्रेरणा नसून 'आपली प्रजाती प्रदीर्घकाळ टिकून राहणे' ही एकच मूळ प्रेरणा त्या-त्या सजीवाच्या प्रजातीच्या ठायी असते. एक व्यक्ती म्हणून सजीवाचे जगणे-मरणे ही गौण बाब असून निसर्गाला खरे मोल प्रजातीच्या टिकून राहण्याचे असते. पृथ्वीवर जीवनाचा सर्वागीण विकास पदार्थमय देहांच्या आधारे होण्यासाठी ही मूलभूत प्रेरणा अत्यावश्यक ठरते. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

Tuesday, August 21, 2012

'प्राण' हा प्राकृतिक पण अ-भौतिक घटक

रॉडनी ब्रुक्स नावाचे एक वैज्ञानिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणार्‍या संशोधकांपैकी एक आहेत. त्यांचा एक लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व कृत्रिम जीव निर्माण करण्याच्या वैज्ञानिक प्रयोगांद्वारे आजवर एकही जीव निर्माण करता आलेला नाही हे ते कबूल करतात. मंगळावर जे स्वयंचलित 'रोव्हर यान' पाठविण्यात आले ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण होते. खरेतर संगणक जी कृत्रिम बुद्धिमत्ता व्यक्त करतो ती विज्ञानाची थक्क करणारी भरारीच आहे. बुद्धिबळात निष्णात खेळाडूला हरविण्याचे सामर्थ्य वैज्ञानिकांनी यंत्रमानवांना प्राप्त करून दिले आहे. तथापि, अतिप्रगत तंत्रज्ञानाने घडविलेला यंत्रमानव व खरा मानव यांच्यातील फरक क्षणार्धात लहान मुलेदेखील ओळखू शकतात. या अपयशाची अनेक कारणे असू शकतात, असेही ब्रुक्स मानतात. त्यापैकी एक कारण म्हणजे सजीवांमध्ये त्यांना निर्जिवांपासून वेगळे करणारा एक असा घटक असावा जो आजतरी विज्ञानासाठी अदृश्य आहे. अर्थात, ब्रुक्स हे अत्यंत आशावादी वैज्ञानिक असल्यामुळे विज्ञान त्या घटकाचा शोध लावेलच, असा त्यांना विश्वासही आहे. परंतु कदाचित तो शोध जीवशास्त्राच्या आजवरच्या धारणा मोडून टाकणाराही असू शकेल, अशीही शक्यता ब्रुक्स वर्तवितात. सापेक्षतेच्या (रिलेटिव्हिटी) सिद्धांताने जशी न्युटनप्रणीत पारंपरिक पदार्थविज्ञान शास्त्रात खळबळ माजवून दिली तसाच प्रकार जीवशास्त्राबाबत घडू शकतो, अशी प्रांजळ कबुली ते देतात. ते कोणते तत्त्व आहे जे सजीवांना निर्जिवांपासून वेगळे करते? सामान्य भाषेत ते तत्त्व 'प्राण' या नावाने ओळखले जाते. परंतु प्राण हे एक स्वायत्त तत्त्व आहे की ती केवळ भौतिक देहात चालणारी 'प्रक्रिया' आहे, याबाबत विज्ञान निश्चित काही सांगत नाही. भौतिक देहात विशिष्ट प्रक्रिया (पोषण, धारणा व पुनरुत्पादन) सुरू होणे म्हणजे जीवन आणि ती प्रक्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू, अशी सध्यातरी विज्ञानाची बहुमान्य धारणा आहे. भौतिक देहात 'प्राण' नावाचा कोणी अभौतिक घटक प्रवेश करतो वा देहातून निघून जातो ही बाब विज्ञानमान्य नाही. परंतु जीवसृष्टी निर्माण करण्यात येत असलेल्या अपयशामुळे ब्रुक्ससारखे वैज्ञानिक त्या शक्यतेला एकदम नाकारतही नाहीत. आपण सामान्य माणसं मात्र हजारो वर्षापासून 'प्राण निघून गेला', 'निष्प्राण शरीर', ' प्राण कंठाशी आले' असे शब्दप्रयोग अनुभवांच्या आधारे करीत असतो. 'प्राणी' हा शब्दच प्राणाचा अस्तित्व-वाचक आहे. प्राण आणि मन वा बुद्धी यातील फरकही सामान्य माणसांना समजतो. मनाचा संबंध कल्पना व विचारांशी आहे, तर प्राणाचा संबंध देहाला जिवंत राखण्यासाठी करावयाच्या घडामोडींशी आहे. श्वासोच्छवास, तहान-भूक, निद्रा, भय, चापल्य, कामवासना इ. प्राणांशी निगडित बाबी आहेत. मनाशी अथवा बुद्धीशी नव्हेत. मानवी पातळीवर भय व कामवासनेसारख्या प्राणिक प्रेरणांमध्ये मनही मिसळते ही बाब वेगळी. निर्जीवातून उगवला असो वा निर्जीवांत अवतीर्ण झालेला असो. परंतु प्राण हा एक वेगळाच प्राकृतिक पण अ-भौतिक घटक असावा असे वाटते. सर्व सृष्टी ही केवळ भौतिक पदार्थाचीच बनलेली असून अ-भौतिक असे कोणतेही तत्त्व सृष्टीत नाही, अशी धारणा बाळगणार्‍यांना 'भौतिकवादी'(मटेरियालिस्ट) म्हणतात. 'भौतिकवाद म्हणजेच विज्ञानवाद' असा एक गैरसमज आहे. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जे गम्य व आकलनीय असेल तेच सत्य मानू अशी धारणा बाळगणे म्हणजे वैज्ञानिक मनोवृत्ती होय. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जर स्थिरचित शांत अवस्थेत एखादे अ-भौतिक तत्त्व सातत्याने अनुभवास आले तर तेही सत्यच मानले पाहिजे. सृष्टीत जे काही आहे त्या सर्वास 'प्राकृतिक' अथवा 'नैसर्गिक' अशी संज्ञा आहे. परंतु जे जे प्राकृतिक किंवा नैसर्गिक आहे ते सर्व भौतिकच असणे आवश्यक नाही. विज्ञान प्रकृतीचा शोध घेते; केवळ भौतिक पदार्थाचा नव्हे! भौतिक पदार्थाशी प्राणाचा संयोग झाल्यावर पृथ्वीवर लक्षावधी जीवजातींची निर्मिती झाली. भोवतालच्या वातावरणातून प्राणवायू(ऑक्सिजन), कर्बाम्ल (कार्बनिक अँसिड), पाणी, नत्रवायू (नायट्रोजन) व अमोनियम ऑक्साईड हे विपुल प्रमाणात व त्यांच्या प्राथमिक स्वरूपात उपलब्ध असलेले निर्जीव घटक शोषून वनस्पती त्यांचे विविध सेंद्रिय पदार्थात रूपांतर करतात. वनस्पतींना खाणारे प्राणी पुन्हा त्या क्लिष्ट रचना असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर कर्बाम्ल, पाणी, नत्र व अमोनियम ऑक्साईड या मूळ घटकांत करून वातावरणास ते मूळ घटक परत करतात. दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल की काही सुटे-सुटे निर्जीव पदार्थ हवेतून शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती त्या निर्जीव पदार्थाना संघटित करून एक क्लिष्ट सेंद्रिय रचना तयार करतात, प्राण्यांना मात्र ही पदार्थाची सेंद्रिय रचना वनस्पतींना खाऊन आयती प्राप्त होते. प्राण्यांमध्ये या सेंद्रिय घटकांना पचविण्याचे अथवा जाळण्याचे कार्य चालते, ज्यातून ऊर्जा निर्माण होते. उष्णता व हालचालींची शक्ती 'प्राणी'जगतास अशा प्रकारे प्राप्त करून देणारे 'वनस्पती'जगत हे खरे पाहता ज्वलनशील सेंद्रिय पदार्थाचे महाभंडारच आहे. वनस्पतींचा मुख्य उपयोग हवेच्या शुद्धीकरणासाठी नसून प्राण्यांना पोषक द्रव्य पुरविण्यासाठी होतो, जेणेकरून प्राणी अधिक शक्तिशाली हालचाली करू शकतील. आणखी वेगळ्या परिभाषेत असेही म्हणता येईल की, 'वनस्पती'जगतात बाल्यावस्थेत उगवलेला 'प्राण' प्राणीजगतात अधिकाधिक विकसित व सामर्थ्यशाली होत जातो. प्राणाची ऊर्जा ही भौतिक ऊर्जेपेक्षा वेगळी आहे. परंतु भौतिक ऊर्जा ही प्राणास बलवान करण्यात साहाय्यभूत निश्चितच ठरते. मरतुकडय़ा शरीराचा परंतु अत्यंत साहसी अथवा अत्यंत निर्भय अथवा अत्यंत कोपिष्ट मनुष्य असू शकतो. धाडस, साहस, निर्भयता, चपळपणा ही बलवान व विकसित प्राणाची लक्षणे आहेत. हे गुण बलवान देहाशी अथवा उच्च वैचारिक बुद्धीशी निगडित असतीलच असे नाही. लक्षावधी प्रकारांच्या प्राणी-देहांमध्ये प्राणांचा जो विविधांगी विकास उत्क्रांतीक्रमांत साधल्या गेला त्याचे चित्तथरारक व मनोहारी दर्शन नॅशनल जिऑग्राफिक अथवा डिस्कव्हरी चॅनेल्सच्या माध्यमांतून टीव्हीवर नित्य होत राहते. मुख्य म्हणजे या सर्व प्राणिक हालचाली देहाचे पोषण, रक्षण व प्रजनन या मूलभूत गरजांतून उद्भवतात व देहाच्या रचनेनुसार आणि भोवतालच्या पर्यावरणानुसार प्राणामध्ये भय, चपळपणा, चलाखी, साहस इ. गुणावगुण उमलतात व वाढतात. निर्जीव पदार्थाना वनस्पती खातात, वनस्पतींना शाकाहारी प्राणी तर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खाऊन पुन्हा मूळचे निर्जीव पदार्थ निसर्गास परत करतात. या अद्भुत सृष्टिचक्रात सूक्ष्मजीवाणूंची कामगिरीसुद्धा अतिशय मोलाची असते. ते सर्व काडीकचरा व निष्प्राण देहांना फस्त करून पृथ्वीची स्वच्छता कायम राखतात.

सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच जीवापासून!

आपण कोण आहोत? आपल्या जीवनाला काही हेतू आहे का? या प्रश्नांचा वेध घेत असता पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राकडून जी सामान्य माणसांना समजू शकेल अशी माहिती मिळू शकते. तिची मांडणी या आधीच्या लेखांकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, ही माहिती मुख्यत: निर्जीव पदार्थाबाबत आहे. आमचे व सर्व सजीवांचे देहदेखील पदार्थमय आहेत, जे निष्प्राण झाल्यानंतर निर्जीव पदार्थातच रूपांतरित होतात. या विश्वातील सर्व निर्जीव पदार्थ व ऊर्जा एकाच मूलतत्त्वाची निर्मिती असून सृष्टीच्या आरंभी तर अवकाश - काळासह सर्व ब्रह्मंड एकाच बिंदूमध्ये सामावले होते, असा विज्ञानाचा बहुमान्य तर्काधारित निष्कर्ष असल्याचेही आपण मागील लेखांकात पाहिले. परंतु या माहितीने आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. भौतिक पदार्थमय देह हा आपल्या मानवी अस्तित्वाचा केवळ एक भाग आहे. कोणताही जीव निव्वळ पदार्थमय नसतो. पदार्थमय देहात प्राण असेल तरच आपण त्या देहाला 'सजीव' म्हणतो. अचेतन सृष्टीची सचेतन होण्याकडे जी वाटचाल सुरू झाली, त्या यात्रेतील पहिला टप्पा प्राण आहे. प्रत्येक सजीव देह हा सूक्ष्म पेशींचा (सेल) बनलेला असतो. एकच पेशी असलेले कित्येक सूक्ष्म जीवाणू असतात तसेच कोटी-कोटी पेशींनी मिळून घडविलेले मानवासारखे व मानवापेक्षाही अगडबंब देह असलेले प्राणी असतात. मात्र या नानाविध देहरचनांचा मूळ घटक असलेल्या पेशींची कार्यपद्धती बरीचशी सारखी असते. अगदी वेगळी कार्यपद्धती असणार्‍या पेशी कदाचित पृथ्वीवर फार पूर्वी अस्तित्वात आल्याही असतील; परंतु त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. विशाल अंतराळातील दूरवरच्या एखाद्या किंवा अनेक ग्रहांवर अशी वेगळी कार्यपद्धती असणार्‍या पेशी व त्या पेशींपासून तयार झालेले सजीव प्राणी अस्तित्वात असतीलही, मात्र त्याबाबत कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनतरी आढळलेला नाही. पृथ्वीवरील प्रत्येक जीवपेशीला एक पातळ त्वचा असते, ज्या त्वचेतून काही द्रव व अतिसूक्ष्म घन पदार्थ आत येऊ शकतात व बाहेरही टाकले जाऊ शकतात. ही पातळ त्वचा त्या पेशीला बाह्य जगापासून वेगळे करते. भोवतालच्या वातावरणातून पोषक घटक आत शोषून घेणे, त्या घटकांवर रासायनिक प्रक्रिया करून स्वत:चे पोषण व दुरुस्ती करणे आणि स्वत:सारखीच दुसरी पेशी निर्माण करून निष्प्राण होणे, हे कार्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये अविरत सुरू असते. पेशीच्या गाभ्यात लांबलचक साखळी असलेले न्यूक्लिक अँसिडचे 'डीएनए' नावाने ओळखले जाणारे जे रेणू असतात, त्या 'डीएनए'मधील जीन्स नावाचे घटक हे त्या-त्या सजीवांच्या देहरचनेचे गुणधर्म ठरवितात. पेशींच्या आत सतत सुरू असलेले हे नवनिर्मितीचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे, जलदगतीचे व प्रचंड उलाढालीचे असते. हजारो रेणूंची त्यासाठी ठरावीक कार्यक्रमानुसार धावपळ सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे रेणू वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पाडत असतात. एखाद्या अजस्र कारखान्यासारखी प्रत्येक पेशीच्या आतली कार्यपद्धती असते. पोषण, दुरुस्ती व नवनिर्माण या कामांसाठी आवश्यक ते पदार्थमय घटक बाह्य वातावरणातून शोषून घेणे व प्रक्रिया झाल्यानंतर अनावश्यक द्रव्य पुन्हा बाह्य वातावरणात सोडून देणे, हे कामही अखंड सुरूच असते. अगदी स्वत:च्या त्वचेची निर्मिती व दुरुस्तीदेखील पेशींच्या आतूनच होत राहते. अशा लक्षावधी पेशींचा मिळून आपला एक-एक अवयव बनतो. त्या पूर्ण अवयवांच्या निर्मितीचा आराखडा प्रत्येक पेशीजवळ असतो. अनेक अवयवांचा मिळून आपला देह बनतो. प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे; परंतु सर्व अवयव एकमेकांना पूरक असतात. कोटय़वधी पेशींचा समूह असलेला देहदेखील ढोबळमानाने पेशींसारखेच कार्य करतो. देहाबाहेरून पोषक अन्न आत घेणे, त्यावर प्रक्रिया करून देहाचे पोषण करणे, अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे, नवीन देहाची निर्मिती करणे व नंतर निष्प्राण होणे! पृथ्वीच्या पोटात, पृष्ठभागावर व वातावरणात सूक्ष्म जीवाणूंची अफाट संख्या असते. आपल्या मानवी दृष्टीला हे जीवाणू दिसत नाही; परंतु आपल्या देहाच्या आत व देहाच्या त्वचेवरदेखील अब्जावधी जीवाणू नांदत असतात. आपल्या देहातील नित्य निष्प्राण होणार्‍या पेशी हे जीवाणू फस्त करतात. ते अतिशय उंच जागी व अतिखोल विवरांमध्ये तसेच कडाक्याच्या थंडीत व होरपळणार्‍या उष्णतेतदेखील टिकाव धरून राहतात. हे सूक्ष्म जीवाणूदेखील पेशींचेच बनले असतात व त्यांच्या पेशीतदेखील व नमूद केलेले कार्य सुरू असते. सर्व सजीव पेशींची रचना व कार्यपद्धती मूलत: समान असल्यामुळे पृथ्वीवर आता आढळून येणार्‍या व ज्यांच्या देहरचनांचा अभ्यास होऊ शकतो अशा पूर्वी नष्ट झालेल्या सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच आद्य जीवापासून किंवा पेशीपासून झाली असावी, असा जीवशास्त्राच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. म्हणजेच पदार्थविज्ञानशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्रदेखील अद्वैताकडे इशारा करते असे मानावे लागेल. सजीवसृष्टीचा प्रारंभ आपल्या पृथ्वीवर सुमारे साडेतीन कोटी वर्षापूर्वी झाला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. प्रथम जीव कसा जन्मला. याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. ज्वालामुखीच्या स्फोटातून निर्माण झालेल्या ढगात मिथेन, अमोनिया व हायड्रोजन विपुल प्रमाणात एकत्र असावे व विजेच्या कडकडाटामुळे त्यांच्या संयोगातून अमिनो अँसिड्स व साखरेसारखे क्लिष्ट रचना असलेले रेणू तयार होऊन जीवनाची उत्पत्ती झाली असावी, असा काही वैज्ञानिकांचा अंदाज आहे. दुसरे काही वैज्ञानिक मात्र सूक्ष्म सजीव प्रथम परग्रहावरून अथवा अंतराळातून उत्कापातासोबत अथवा धूमकेतूच्या शेपटीवर स्वार होऊन पृथ्वीवर आले व त्यांनीच येथे जीवनाचा विस्तार केला, असे मानतात. वैज्ञानिकांचा तिसरा गट असे मानतो की, तीन कोटी वर्षापूर्वी सूर्य सध्यापेक्षा कमी तेजस्वी असल्यामुळे पृथ्वीवर हिमयुग होते व शेकडो फूट जाडीचा बर्फाचा थर समुद्रावर पसरला होता. त्या थराखाली समुद्राच्या तळाशी जीवनिर्मितीला पोषक वातावरण व घटक असल्यामुळे तिथे प्रथम जीवनिर्मिती झाली असावी. इतरही काही वेगळ्या मान्यता आहेत. सारांश, पृथ्वीवर सजीवसृष्टीचा प्रारंभ नेमका कसा व कोणत्या कारणाने झाला याबाबत वैज्ञानिकांचे एकमत नाही. मात्र आज अस्त्विात असलेल्या सर्व सजीवांचा आद्य पूर्वज एकच असावा याबाबतीत मात्र दुमत आढळून येत नाही. आपल्या सामान्य भाषेत असे म्हणू की किडय़ामुंग्यांसह आपण सर्व सजीवांमध्ये एकच प्राणतत्त्व प्रवाहित असतो.

विश्वाचा प्रारंभ एकाच बिंदूपासून!

निर्जीव पदार्थ (मॅटर) व विविध प्रकारच्या ऊर्जा (एनर्जी) मूलत: एकाच तत्त्वापासून विस्तारल्या आहेत ही बाब आता विज्ञानमान्य झाली असून या प्रचंड विश्वाचा प्रारंभदेखील एकाच बिंदूपासून झाला असावा, असाही अनेक मोठमोठय़ा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. कारण असे, की पृथ्वीवरून अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने अंतराळाचे निरीक्षण केले असता दिसणार्‍या सर्व आकाशगंगा (प्रत्येक आकाशगंगेत करोडो सूर्यमाला असतात.) पृथ्वीपासून सर्व दिशांनी दूर दूर जाताना दिसतात. एखाद्या फुग्यावर अगदी छोटय़ाछोटय़ा अनेक चकत्या चिकटवून त्या फुग्यात हवा भरू लागलो, तर त्या फुग्यावरील सर्व चकत्या एकमेकांपासून दूर जातात. परंतु त्या चकत्यांचे आकार वाढत नाहीत. तसेच काहीसे घडत आहे. आकाशगंगांच्या दूर दूर जाण्याचा वेगदेखील शास्त्रज्ञांनी मोजला असून त्या वेगाची दिशा बघूनच त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फार-फार पूर्वी म्हणजे विश्वाच्या आरंभी विश्वातील सर्व ग्रहतारे हे एकाच बिंदूमध्ये सामावले असावे व त्या बिंदूतून झालेल्या अतिप्रचंड स्फोटामुळे (बिगबॅंग) दशदिशांना ऊर्जा फेकली गेली. जिचे रूपांतर हळूहळू तारे व ग्रहगोलांमध्ये आणि विविध पदार्थामध्ये होत गेले. आपण ज्याला काळ (टाइम) व अवकाश (स्पेस) म्हणतो त्यांना विश्वारंभापूर्वी अस्तित्वच नव्हते ही कल्पना समजणे अवघडच आहे! काळ आणि अवकाश यांनी बद्घ असलेल्या लांबी, रुंदी व उंची या त्रिमितीतच जाणवणार्‍या भौतिक विश्वाचाच एक क्षुद्रातिक्षुद्र घटक असलेला मनुष्यप्राणी त्या त्रिमितीपलीकडे व अवकाश-काळापलीकडे काही असून शकेल अशा शक्यतेच्या पातळीवरच सूट देऊ शकतो. परंतु ते पलीकडील अस्तित्व कसे असेल याबाबत कल्पना करण्यास तो असमर्थ ठरतो. असो. परंतु महास्फोटाचा (बिगबॅंग) हा सिद्धान्त सर्वच वैज्ञानिकांना मान्य नाही. फ्रेड हॉईल व आपले डॉ. जयंत नारळीकर यांच्या संशोधनातील अनुमानानुसार दृश्य विश्व अनादिअनंत असून त्यातील काही भागात अधूनमधून स्फोट होत राहतात व पदार्थाचा नाश व नवनिर्मिती या क्रियाही घडत राहतात. त्यामुळे विश्वाचे संतुलन कायम राहते. सर्व आकाशगंगा (गॅलॅक्सीज) एकमेकांपासून वेगाने दूर जाताना आढळत असल्या तरी अधूनमधून विश्व थोडेबहुत आकुंचनही पावते व पुन्हा प्रसरणशील होते. मात्र अलीकडील काळात महास्फोटाच्या सिद्घान्तालाच वैज्ञानिक जगतात जास्त मान्यता मिळत असल्याचे आढळून येते. विश्वनिर्मितीबाबत सध्या अंदाजाच्या स्वरूपातच असलेल्या वेगवेगळ्या सिद्धान्तांमध्ये काही मूलभूत गृहीतके मात्र समान आहेत. उदाहरणार्थ, प्रकाशापेक्षा अधिक वेग कोणत्याही पदार्थाचा असू शकत नाही व विश्वातील एकूण ऊर्जा नेहमीच कायम असते. ऊर्जा रूपांतरित होते; पण नष्ट होत नाही. मध्यंतरी वृत्तपत्रांत एक खळबळजनक बातमी प्रसिद्ध झाली, की प्रकाशापेक्षा अधिक वेगवान असलेला एक मूलकण वैज्ञानिक प्रयोगात आढळून आला. ही बातमी खरी असल्यास पदार्थविज्ञानशास्त्राला पुन्हा शीर्षासन करावे लागेल. आतापावेतो वैज्ञानिकांना ही बाब स्पष्टपणे उमजली आहे, की या विश्वात करोडो आकाशगंगा (गॅलॅक्सीज) असून प्रत्येक आकाशगंगेत आपल्यासारख्या करोडो सूर्यमाला असू शकतात. आपल्या पृथ्वीवरून पाहिले असता प्रत्येक आकाशगंगा आपल्यापासून वेगाने दूर जात आहेत. त्यातही जी आकाशगंगा आपल्यापासून जितकी दूर तितका तिचा वेग जास्त. हे दृश्य फक्त पृथ्वीवरूनच अनुभवता येईल असे नव्हे. विश्वातील प्रत्येक जागेवरून पाहिले असता असेच आढळून येईल. म्हणजेच विश्व एखाद्या फुग्यासारखे प्रसरण पावत आहे व प्रसरणासोबतच अवकाश व काळाची नवनिर्मितीही करत आहे. अवकाश (स्पेस) आणि काळ (टाइम) या परस्परांशी मुळीच संबंधित नसलेल्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे पूर्वी मानले जाई. परंतु महान प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी लांबी, रुंदी व उंची या अवकाशाच्या तीन मितींशी/आयामांशी (डायमेन्शन्स) घट्टपणे निगडित असलेली चौथी मिती म्हणजे काळ होय हे शोधून काढले. एकाच जागी उभे असलो तर आपण फक्त काळातून प्रवास करतच असतो. परंतु चालू लागताच आपण अवकाश-काळाच्या चौमितीतून प्रवास करू लागतो. आपण अतिशय वेगाने अवकाशातून प्रवास करू लागलो, तर अवकाश वाढल्यामुळे काळ लहान होतो म्हणजेच घडय़ाळ हळू चालू लागते. प्रकाशाचा वेग जवळपास 3 लक्ष कि.मी. प्रतिसेकंद इतका आहे. त्या वेगाच्या आसपास आपला वेग वाढल्यास काळ जणू स्तब्ध होतो. म्हणजे घडय़ाळ थांबून जाईल. दोन तरुण जुळ्या भावांपैकी एक जण जर अंतराळयानातून भ्रमण करून अनेक वर्षानी पृथ्वीवर परतला, तर त्याचे वय फारसे वाढलेले नसेल. पण पृथ्वीवरचा भाऊ मात्र तोपावेतो चक्क म्हातारा झाला असणार. असे हे अवकाश-काळयुक्त चौमिती विश्व आरंभी केवळ लांबी-रुंदी-उंची नसलेल्या एका बिंदूत महाऊर्जेच्या रूपात सामावले होते अशी गंभीर मांडणी आता वैज्ञानिक करताहेत. विश्व शून्यातून निर्माण झाले असे विज्ञान म्हणू शकत नाही. कारण विश्वातली एकूण ऊर्जा ही अक्षय आहे म्हणजे तिचे रूपांतर दुसर्‍या ऊर्जेत अथवा पदार्थात होईल. परंतु ऊर्जेचा र्‍हास कधीच होत नसतो - हा विज्ञानाचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. त्यामुळेच विश्वनिर्मितीपूर्वी हे आज असीम भासणारे संपूर्ण विश्व, त्यातील अब्जावधी ग्रहतार्‍यांसह महाप्रचंड ऊर्जेच्या स्वरूपात एकाच बिंदूमध्ये सामावले असणार आणि महास्फोटानंतर ती महाऊर्जा प्रकट होऊन अवकाश-काळाची निर्मिती करत प्रसरण पावू लागली. या महास्फोटाच्या वेळी जी अतिप्रचंड उष्णता निर्माण झाली असेल त्या उष्णतेमध्ये पदार्थाचे अणूसारखे घटक तयार होणे अशक्य होते. तापमान पुरेसे कमी झाल्यानंतर प्रोटॉन-न्यूट्रॉनयुक्त अणुगर्भाच्या रचना तयार झाल्यात व कालांतराने पदार्थमय वायुगोळे निर्माण होऊन तार्‍यांची सृष्टी झाली. एक गमतीचा भाग असा, की शास्त्रज्ञांच्या मते, सृष्टिनिर्मितीच्या अगदी सुरुवातीस चारपेक्षा अधिक मिती (डायमेन्शन्स)मध्ये विश्व साकार होत गेले. परंतु लवकरच त्यापैकी बाकीच्या मिती (बहुतेक 6 किंवा 7) आपल्या चौमिती विश्वापासून वेगळ्या होऊन अतिसूक्ष्म आकारात आकुंचन पावल्या. दुसरी गंमत अशी, की प्रत्येक पदार्थ (मॅटर) कणासोबत त्याच्या विरुद्ध गुणधर्म असणारा परंतु समान वस्तुमानाचा दुसरा पदार्थकण (अँण्टिमॅटर)देखील सुरुवातीस निर्माण झाला. उदा. इलेक्ट्रॉन इतकेच वस्तुमान असलेला परंतु घन (पॉझिटिव्ह) विद्युतभार असलेला पॉझिट्रॉन नावाचा मूलकण. इलेक्ट्रॉनमध्ये ऋण (निगेटिव्ह) विद्युतभार असतो. मॅटर व अँण्टिमॅटर एकमेकांस नष्ट करू लागले. परंतु अंतिमत: मॅटरची मात्रा अँण्टिमॅटरपेक्षा किंचित जास्त होऊन पुढे मॅटरचाच फैलाव झाला. यावरून आपल्या पुराणकथांमधील देवदानव संघर्षाची कथा स्मरते. दानव देवांना भारी पडत होते. पुराणानुसार अशा वेळी देव महादेवांचा धावा करायचे आणि महादेवांना हस्तक्षेप करून दानवांची बाजू लंगडी करावी लागे. त्या सृष्टी आरंभकाळात दानवांची सरशी झाली असती, तर पृथ्वीचा विनाश निश्चित होता. प्रश्न असा पडतो, की अँण्टिमॅटरपेक्षा मॅटर भारी ठरले. हे केवळ योगायोगाने, अपघाताने की, त्या महाऊर्जेच्या उदरात असलेल्या चैतन्याच्या संकल्पामुळे?

ब्रह्मंडाचा थक्क करणारा पसारा

असामान्य बुद्धिमत्ता, कल्पकता व अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने विश्वाच्या जडणघडणीचे, त्याच्या स्वरूपाचे व नियमांचे जे दर्शन वैज्ञानिकांना झाले त्यापैकी आपल्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत जितकी माहिती झिरपते, त्यावरून असे निश्चितच म्हणता येते की, ब्रह्मंडाचा हा पसारा थक्क करून सोडणारा आहे. सतत जळत राहून प्रचंड ऊर्जा प्रस्फुटित करत राहणारे सूर्यासारखे अब्जावधी तारे, त्या तार्‍यांच्या भोवती एका निश्चित गतीने व निश्चित कक्षेत फिरत असलेले ग्रह, त्या ग्रहांभोवती तसेच काटेकोर कक्षेत फिरत असलेले उपग्रह, या कोटी-कोटी सूर्याची, ग्रहांची व उपग्रहांची मिळून बनलेली एक आकाशगंगा, ज्यातील सर्व सूर्यमाला एका केंद्राभोवती फिरत आहे; अशा अनेकानेक आकाशगंगांचे समूह जे सर्व मिळून पुन्हा एका तिसर्‍याच केंद्राभोवती फेर धरतात! शिवाय हे सर्व आकाशगंगाचे समूह त्याचवेळी एकमेकांपासून विलक्षण गतीने दूर-दूर जातच आहेत. हे सर्व सूर्य अब्जावधी तारे, ग्रह, उपग्रह करोडो वर्षापासून नियमबद्ध वागत आहेत. शिवाय या ब्रह्मंडात मध्येच कुठेतरी प्रचंड कृष्णविवरेदेखील आहेत, जे त्यांच्या विशिष्ट कक्षेच्या आत शिरणार्‍या सूर्यमालांनाच नव्हे तर अख्ख्या आकाशगंगेला गिळून टाकतात. या कृष्णविवरांना (ब्लॅकहोल्स) आकार नसतो, परंतु लक्षावधी तार्‍यांचे वस्तुमान (मास) व ऊर्जा त्या विवरातील एकाच बिंदूत सामावलेली असते. त्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी वाढलेली असते की प्रकाशकिरणदेखील त्या विवरातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच ते कृष्णविवर आम्हाला दिसू शकत नाही. काही वैज्ञानिकांच्या मते या कृष्णविवरांमध्ये ओढल्या जाणार्‍या वस्तू (वस्तू म्हणजे महाकाय तारे व त्यांचे ग्रह, उपग्रह) आतील भयानक उष्णतेने पूर्णत: वितळून त्यांचे पदार्थरूप नष्ट होऊन निव्वळ एकाच मूलभूत ऊर्जेत रूपांतरित झाल्यावर ती ऊर्जा आम्हाला सध्या माहीत नसलेल्या वेगळ्याच कोणत्यातरी विश्वाच्या किंवा आमच्याच विश्वातील वेगळय़ा ठिकाणी नवनिर्मितीसाठी उपयोगात आणली जात असावी. जी कथा ब्रह्मंडाची तीच अणूची. प्रत्येक पदार्थातील सर्वात सूक्ष्म घटक म्हणजे अणू. तो आकाराने इतका सूक्ष्म असतो की एका केसाच्या टोकावर पाच लक्ष अणू मावतात! इतक्या सूक्ष्म पदार्थापेक्षा आणखी सूक्ष्म ते काय असणार? वैज्ञानिकांनी त्या अणूचेही अंतरंग शोधून काढलेच. ते तर आणखी थक्क करणारे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्व आहे. सूर्याभोवती जसे पृथ्वीसारखे ग्रह फिरत राहतात व मध्ये पोकळी असते तसेच अणूच्या पोटात मध्यभागी एक अतिसूक्ष्म असे केंद्र असते व त्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन नावाचे सूक्ष्म कण प्रचंड वेगाने फिरत असतात. हे गरगर फिरणारे इलेक्ट्रॉन आणि अणूचे केंद्र यांच्यामध्ये खूप मोठी पोकळी असते. केंद्रस्थानी प्रोटॉन व न्यूट्रॉन नावाचे इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जास्त वस्तुमान असलेले सूक्ष्मकण असतात. अणूच्या आतली पोकळी किती मोठी असते? एखाद्या मोठय़ा सभागृहाच्या मध्यभागी एक माशी ठेवली तर त्या सभागृहाच्या आकाराच्या मानाने माशीचा आकार लक्षात घेऊन मधल्या पोकळीची जी कल्पना आपण करू, त्याच प्रमाणात अणूचा आकार व त्याचे केंद्र यांच्यातील पोकळी असते. म्हणजे आमच्या दृष्टीला व स्पर्शाला जे जे भरीव व ठोस भासणारे पदार्थ जाणवतात ते प्रत्यक्षात अतिशय विरविरीत व महापोकळ असतात. परंतु एखादे अनेक आरे असलेले चक्र वेगाने फिरत असले तर त्यातील आर्‍यांमधील पोकळी आपल्या नजरेस दिसत नाही. तसेच इलेक्ट्रॉन्सच्या प्रचंड गतिमान फेर्‍यांमुळे आम्हाला पदार्थ ठोस वाटू लागतो. अणुगर्भातील प्रोटॉन व न्यूट्रॉन हे सूक्ष्म कणदेखील अविभाज्य नसून तेसुद्धा क्वार्क नावाच्या अतिसूक्ष्म कणांपासून बनले आहेत. त्याशिवाय या अतिसूक्ष्म कणांना एकमेकांशी जोडून ठेवणारे 'फोर्स पार्टिकल्स' या जातीत मोडणारे आणखी वेगळेच अतिसूक्ष्म कण आहेत. अणूच्या आतली रचना अशाप्रकारे चक्रावून सोडणारी आहे. एकापेक्षा अधिक अणू (अँटम) एकत्र येऊन रेणूची (मॉलिक्युल) रचना होते. जसे हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. आता या रेणूचे गुणधर्म पुन्हा त्याच्या घटक अणूंच्या गुणधर्मांपेक्षा विपरीत असू शकतात. म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू ज्वलनशील असतात, पण पाणी मात्र पेटूच शकत नाही! सर्व सजीवांचा आधार असलेले डीएनए रेणू त्या त्या सजीव प्राण्याच्या संभाव्य विकासाचा सर्व आराखडा बाळगून असतात. आपल्या देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये हे डीएनए रेणू आहेत. ज्युरासिक पार्क या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एका डीएनए रेणूतून संपूर्ण प्राण्याची निर्मितीही करता येईल. देहाच्या प्रत्येक अवयवाचा रंग, रूप, आकार व अंतर्गत रचनेचा स्पष्ट आराखडा या अतिसूक्ष्म डीएनए रेणूमध्ये कसा साठवला जातो? त्याच्या मदतीला धावपळ करणारे 'निरोप्ये' आरएनए नावांचे रेणू असतात. ते सुजाण असतात काय? प्रत्येक जीवपेशीतील डीएनए रेणू हे त्या त्या पेशीचे आर्किटेक्ट, इंजिनिअर, गवंडी, डॉक्टर, नर्स, आई वगैरे सर्व ऑल-इन-वन असतात. एका जीवपेशीच्या उदरात दुसरी जीवपेशी सुखाने नांदू लागल्यावर मोठय़ा आकारांचे सजीव निर्माण झाले. कोटी-कोटी पेशी (सेल्स) एकत्र येऊन देहरचना करतात. देहाच्या प्रत्येक अवयवाची रचना वेगळी, कार्यही वेगळे. देहातील लक्षावधी पेशी दरक्षणी नष्ट होतात, त्यांची जागा नवनिर्मित पेशी घेत राहतात आणि तरीही त्या देहाचे जीवन अखंड सुरू राहते. गळून पडणार्‍या पेशींपेक्षा नवनिर्मित पेशींची संख्या कमी होत गेली की वार्धक्य व मृत्यूकडे वाटचाल सुरू होते., परंतु मृत्यूपूर्वी स्वत:सारखा दुसरा देह निर्माण करूनच सहसा प्रत्येक प्राणी-जीवनाचा अंत होतो. ही सर्व एकाचवेळी महाविराट व अतिसूक्ष्म, गुंतागुंतीची पण नियमबद्ध रचना काय दर्शविते? आणि पृथ्वीवर सजीवांच्या उत्क्रांतीसोबत विकसित होत गेलेली ती असतेपणाची जाणीव, त्या जाणिवेला फुटलेले वासनांचे, विकारांचे, बुद्धीचे, विचारांचे, कल्पनांचे, प्रतिभेचे धुमारे-ते कशासाठी?

जीवनाचा खरंच काही हेतू आहे?

आपण कोण आहोत? आपल्याला दिसणार्‍या, जाणवणार्‍या सृष्टीपलीकडे आणखी काही अस्तित्वात आहे का? सृष्टीच्या निर्मितीला काही प्रयोजन आहे का? या जन्मापूर्वी आपण अस्तित्वात होतो का? मृत्यूनंतर आपण पूर्णपणे संपणार की काही आपला अंश शिल्लक राहणार? सृष्टीचा कोणी निर्माता आहे की ती नुसतीच प्रयोजनशून्य अनादि-अनंत अपघातांच्या व योगायोगांच्या मालिकेतून साकारत चाललेली स्वयंभू जड ऊर्जा आहे? आपले शरीर, अंत:करण, बुद्धी, ज्ञानेंद्रिये, संवेदना, इच्छा, भय, विकार, वासना, विचार या सर्वाचा समुच्चय म्हणजे आपण आहोत, की या समुच्चयापेक्षाही वेगळे असे आपले 'स्वत्व' आहे? आपला व सृष्टीचा निर्माता जर कोणी खरंच असला, तर तो कुठे असतो? कसा दिसतो? काय करतो? त्या निर्मात्याचा निर्माता कोण? आणि निर्मितीचा उद्देश काय? या निर्मितीवर निर्मात्याचे नियंत्रण आहे, की ती केवळ भौतिक नियमांनी बांधलेली स्वयंचलित यंत्रणा आहे? जीवनाचा हेतू काय? खरंच जीवनाला काही हेतू आहे, की ही सर्व एक निर्हेतुक, उद्देश्यविहीन, प्रयोजनशून्य गतिमानता आहे? सर्व मानवांना नव्हे, परंतु भिन्न-भिन्न संस्कृतींमधील परस्परांना सर्वस्वी अनोळखी असलेल्या व वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या असंख्य मानवांना वरील प्रकारच्या प्रश्नांनी सतत भेडसावलेले आहे. सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याचा प्राचीन काळापासून मानवाने जो प्रयत्न चालविला, त्यातून एक गोष्ट तर निर्विवाद सिद्ध झाली आहे की, पदार्थाच्या व ऊर्जेच्या अंतरंगापर्यंत पोहोचून, जड सृष्टीतील अनेकानेक नियम जाणून घेऊन व त्या नियमांचाच वापर करीत मानवाने आपल्या भोवतालच्या सृष्टीवर बरेचसे नियंत्रण प्राप्त केले आहे. म्हणजे आज आपल्याला जे काही नैसर्गिक पदार्थ दिसतात व वीज, उजेड, चुंबक यासारख्या विविध ऊर्जा जाणवतात, त्या सर्वाची निर्मिती हेतुपूर्वक झाली असो वा योगायोगाने अनेक अपघातांच्या मालिकेतून झालेली असो, ते सर्व पदार्थ व ऊर्जेची ती विविध रूपे काही कठोर नियमांनी बांधलेली आहेत. ते नियम समजून घेतल्यास त्या पदार्थाना वा बहुरूपी ऊर्जेला काही प्रमाणात मानव आपल्या नियंत्रणात आणू शकतो.अगदी मुळाशी जाऊन पाहिले तर पदार्थ आणि ऊर्जा या दोन वेगळ्या वस्तू नसून मूलत: एकच वस्तू आहे, असेही आता विज्ञानाने शोधले आहे. प्रकाशाचे उष्णतेत, विजेत, ध्वनीत वगैरे रूपांतर तर होतेच. विद्युत-चुंबकीय बल, परमाणूमध्ये इलेक्ट्रॉन्सना धरून ठेवणारे क्षीण बल, अणुगर्भातील प्रोटॉन, न्यूट्रॉन इ. मूलकणांना धरून ठेवणारे भारी बल व गुरुत्वाकर्षण अशी चार प्रकारची ऊर्जेची रूपे वैज्ञानिकांना सध्या तरी दिसतात. या चार बलांचे एकमेकांत रूपांतर होत असते काय व होत असल्यास ती एकमेव मूळ ऊर्जा कोणती, हे बहुधा लवकरच कळेल. पदार्थाच्याही अंतरंगात शोध घेतल्यावर परमाणूच्या पोटातील मूलकणांची यादी झाली असून त्या मूलकणांची वर्तणूक कधी पदार्थासारखी तर कधी ऊर्जेसारखी असल्याचे आढळून आले आहे. एक मजेशीर बाब म्हणजे परमाणूच्या अंतरंगातील व सृष्टीतील दूरवरच्या अंतराळातील पदार्थाच्या हालचाली बहुधा कठोर नियमांनी बांधलेल्या नसून त्यात काही अनिश्चितता व गोंधळही जाणवतो (आपल्याला परिचित असलेल्या ढोबळ पदार्थाच्या तुलनेत), असेही वैज्ञानिकांना वाटते. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाने कमालीची झेप घेतली असून सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य शोधून काढण्यासाठी आता वैज्ञानिक प्रचंड महागडे प्रयोग करत आहेत. एकीकडे परमाणूच्या अंतरंगात तर दुसरीकडे अथांग अंतराळात चाललेल्या संशोधनाने दूरसंचार क्षेत्रामध्ये घडवून आणलेल्या अभूतपूर्व क्रांतीचा लाभ सामान्य माणसाच्या पदरात मागील दोन-तीन दशकांपासून पडू लागलाय. याचे ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, अतिप्रगत रंगीत टी.व्ही. संच, संगणक, इंटरनेट या गोष्टी आता सामान्यांच्या आवाक्यात आल्या. त्यांची कल्पनादेखील 40-50 वर्षापूर्वी करणे अशक्य होते. अचेतन सृष्टीसोबतच सचेतन सृष्टीचा म्हणजेच जीवनाचाही शोध मानव विविध पद्धतींनी घेत राहतो. अचेतन पदार्थ व सचेतन जीव यांच्या सीमारेषेवर नक्की काय घडले हे जाणून घेण्याची विज्ञानाची उत्कंठा कायम आहे. जीवनाला धारण करण्याची क्षमता असणारी एक किमान संरचना पदार्थात निर्माण झाल्यावरच त्यातून जीवन प्रस्फुटित झाले हे निश्चित! पण मग जीवनाची संभावना निर्जीवामध्ये प्रारंभापासून होती, फक्त योग्य ती रचना साकारण्यात वेळ गेला असे मानावे लागेल. नाही तर पदार्थाची धारणक्षमता तयार झाल्यानंतर त्यात प्राण एका वेगळ्या पातळीवरून अवतरला व नंतर विविध रचना व आकारांच्या माध्यमातून विकसित होत गेला, असे तरी मानावे लागेल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीक्रमात काही जीवांमध्येच मन व बुद्धीचा विकास होत गेला व त्या विकासाने सध्या गाठलेले शिखर म्हणजे मनुष्यप्राणी होय, असे दिसून येते; परंतु मानवाची निर्मिती हा पृथ्वीवरील उत्क्रांतीचा अंतिम टप्पा आहे काय? की आज आम्हाला अज्ञात असलेल्या चेतनेच्या उच्चतर पातळ्यांना धारण करू शकणारा अथवा स्वत:तून प्रगट करू शकणारा नवा 'प्राणी' उत्क्रांतीक्रमात जन्माला येईल, जो मानवापेक्षा अधिक विकसित जीव सिद्ध होईल? विज्ञानाच्या दृष्टीतून पाहिले असता अतिसूक्ष्म जीवाणूंपासून मानवापर्यंत जीवनाची उत्क्रांती टप्प्याटप्प्याने होत गेल्याचे समजते. आता तर जैवपूर्व (प्रि-बायोटिक) म्हणजे सजीव पेशी प्रथम निर्माण होण्यापूर्वी निर्जीव पदार्थात जी उत्क्रांतीची प्रक्रिया घडली असेल तिचाही अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्राच्या आधारे होत आहे. त्या अभ्यासात बरीच प्रगतीही झाल्याचे समजते.; परंतु प्रत्यक्षात निर्जीव पदार्थातून प्राण नेमका कसा प्रगटला व प्राणी जीवनात आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) मनुष्य पातळीवर कसे प्रगटले, या टप्प्याबाबत विज्ञान अजूनही चाचपडत असून केवळ अंदाज व्यक्त होतोय. असो. मात्र प्राण आणि बुद्धी व अंत:करण यांना देहाशिवाय वेगळे अस्तित्व नाही असे मानले व देहाच्या उत्क्रांतीतूनच ते प्रगटले असे गृहीत धरले तर आणखी एक बाब गृहीत धरणे भाग पडते. ती म्हणजे प्राण, जीवन, अंत:करण, बुद्धी, कल्पनाशक्ती, विचारक्षमता, वासना, भावभावना, प्रतिभा या सर्व बाबी निर्जीवांच्या ठायीदेखील बीजरूपाने असणारच! कारण बीजरूपाने मुळात अस्तित्वात असलेली संभावनाच उत्क्रांतीक्रमात प्रगटू शकते.